परंडा (प्रतिनिधी)- पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील खासापूर येथील एका होतकरू तरुणानं टोकाचं पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपवली आहे. प्रथमेश दिलीप देशमुख (वय 26) असं या दुर्दैवी तरुणाचं नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण परंडा तालुक्यासह राज्यभरातून हळहळ व्यक्त होत आहे.

         

नेमकी पार्श्वभूमी आणि संघर्ष:

प्रथमेश गेल्या चार वर्षांपासून पुणे येथे राहून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत एमपीएससीची तयारी करत होता.घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे त्याचे दाजी त्याला दरमहा 8 ते 10 हजार रुपये पाठवायचे, ज्यातून तो पुण्यात अभ्यास करत होता.कौटुंबिक आर्थिक अडचणींमुळे त्याला अनेकदा उपाशीपोटी किंवा एका वेळच्या जेवणावर दिवस काढावे लागत होते.त्याच्या डोक्यावर दोन-अडीच लाखांचे कर्ज आणि उधारी झाली होती. ग्रामीण भागातील एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलाला केवळ एवढ्याशा कर्जासाठी व रोजगाराच्या अभावामुळे टोकाचे पाऊल उचलावे लागल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.

   

“लाल दिव्याच्या गाडीत येणार होता, पण..“

प्रथमेशच्या निधनानंतर त्याच्या आईचा व कुटुंबाचा टाहो काळीज पिळवटून टाकणारा आहे. “माझा मुलगा अधिकारी होऊन लाल दिव्याच्या गाडीत घरी येणार होता, पण तो थेट अँबुलन्समध्ये आला,“ अशी हंबरडा फोडत आईने दिलेली प्रतिक्रिया उपस्थितांचे डोळे पाणावणारी ठरली. त्याच्या पश्चात आई आणि पाच बहिणी असा परिवार असून, वडिलांचे छत्र हरपले होते.


कॉक्रोज जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत यांच्याकडून सांत्वन व आंदोलनाचा इशारा

घटनेची माहिती समजताच कॉक्रोज जनता पार्टीचे प्रमुखचे अभिजीत दीपके यांनी गुरुवार दि.10 रोजी तालुक्यातील खासापूर येथे जाऊन प्रथमेशच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. कुटुंबीयांच्या व्यथा ऐकून अभिजीत दीपके देखील भावूक झाले.प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी, “हा व्यवस्थेने घेतलेला बळी आहे,“ असा गंभीर आरोप केला. तसेच ग्रामीण भागातील तरुणांवर बेरोजगारीची वेळ आणणाऱ्या आणि स्पर्धा परीक्षांच्या गोंधळाला जबाबदार असलेल्या या परिस्थिती विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली आहे. याशिवाय शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रणजीत पाटील यांनीही देशमुख कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले आहे.

 
Top