मुरुम (प्रतिनिधी)- राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एकात्मिक कौशल्याधारित अभ्यासक्रम, बहुविषयक अध्ययन आणि भारतीय ज्ञानपरंपरेचा शिक्षणामध्ये प्रभावी समन्वय आवश्यक आहे, असे प्रतिपादन डॉ. सय्यद अझरुद्दीन यांनी केले. ते .मंगळवार दिनांक 08 सप्टेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर आणि श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एकदिवसीय कार्यशाळेत बोलत होते. कार्यशाळेचेचे उद्घाटन भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. अमोल मोरे यांच्या हस्ते झाले.  कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी भारत शिक्षण संस्थेचे सहसचिव डॉ. सुभाष वाघमोडे होते. यावेळी मा. पद्माकरराव हराळकर, प्राचार्य डॉ. संजय अस्वले, प्राचार्य डॉ. हरिदास फेरे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यशाळेचे  प्रस्ताविक प्राचार्य डॉ. संजय अस्वले यांनी केले.

यावेळी बोलताना प्रो. सय्यद अझरुद्दीन म्हणाले की, विद्यार्थ्यांना केवळ पदवी न देता रोजगारक्षम कौशल्ये, सर्जनशीलता आणि व्यापक दृष्टिकोन विकसित करणारे शिक्षण देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. सुभाष वाघमोडे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.

कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात नांदेड येथील प्रो. डी. एन. मोरे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात सुरू असलेल्या मल्टिपल एन्ट्री -मल्टिपल एक्झिट पद्धती विषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रवासात विविध टप्प्यांवर प्रवेश घेण्याची, अभ्यासक्रमातून बाहेर पडण्याची तसेच पुन्हा शिक्षणाशी जोडून घेण्याची लवचिकता या व्यवस्थेमुळे मिळणार आहे. बदलत्या शैक्षणिक गरजा आणि विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणारी ही संकल्पना उच्च शिक्षण अधिक विद्यार्थी-केंद्रित आणि लवचिक बनविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे प्रा. डॉ. मोरे यांनी स्पष्ट केले.

कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात ‌‘अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट व पोर्टलची स्थापना' या विषयावर अधिष्ठाता एम. के. पाटील यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्रेडिटचे संकलन व हस्तांतरण सुलभ करण्यासाठी शैक्षणिक क्रेडिट बँक महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शैक्षणिक क्रेडिट बँकेची कार्यपद्धती स्पष्ट करण्यात आली. तसेच पोर्टलवरील नोंदणी व आवश्यक प्रक्रियेची माहिती त्यांनी दिली. विद्यार्थीकेंद्रित आणि लवचिक उच्च शिक्षणासाठी ही प्रणाली उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तिसऱ्या सत्रात डॉ गणेश काथार, एन सी एस चे डॉ अनिल जाधव, यानी इंटर्नशिप आणि  ऑन जॉब ट्रेनिंग  तसेच डॉ लक्षकौशिक पुरी, फील्ड प्रोजेक्ट यावर  मार्गदर्शन केले. तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी आणि त्यासमोरील आव्हाने या विषयावर खुली चर्चा घेण्यात आली. या चर्चेत प्राध्यापकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत धोरणाच्या अंमलबजावणीतील विविध शैक्षणिक, प्रशासकीय व व्यावहारिक अडचणींवर विचारमंथन केले. तसेच प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक उपाययोजना व अनुभवांची देवाणघेवाण करण्यात आली. सहभागी प्राध्यापकांच्या सक्रिय सहभागामुळे हे सत्र अत्यंत संवादात्मक व प्रभावी ठरले. कार्यशाळेसाठी धाराशिव जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातून आलेले प्राचार्य डॉ. रामदास ढोकळे, प्राचार्य डॉ. हनुमंत माने, प्राचार्य डी. व्ही. माने, प्राचार्य अनुराधा जगदाळे, प्राचार्य सुभाष राठोड, प्राचार्य डॉ. माने, डॉ. अनिल जाधव, डॉ. गणेश कठार, डॉ. लक्षकौशिक पुरी, उपप्राचार्य डॉ. विनोद देवरकर, डॉ. पद्माकर पिटले, प्रा. जी. एस. मोरे, पर्यवेक्षक शैलेश महामुनी यांच्यासह धाराशिव जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतील सहभागी 260 प्राध्यापक उपस्थित होते.  सूत्रसंचालन कार्यशाळेचे समन्वयक डॉ. डी. बी. ढोबळे यांनी केले, तर आभार डॉ. चंद्रसेन करे यांनी मानले.

 
Top