येरमाळा (प्रतिनिधी)- आराध्य दैवत श्री येडेश्वरी देवीचा नारळी पौर्णिमा यात्रोत्सव शुक्रवारी (ता.28) पार पडणार आहे. देवीची पालखीची गाव प्रदक्षिणा मिरवणूक तर देवीच्या मंदिर पायथ्याला दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम शुक्रवारी दुपारी चार वाजता होणार आहे. श्री येडेश्वरी देवीच्या दोन यात्रा साजऱ्या केल्या जातात. नारळी पौर्णिमा ही दुसरी यात्रा मानली जाते. देवीचे सगळे उत्सव दुसऱ्या पौर्णिमेलाच साजरे केले. त्यामुळे देवीच्या पालखी गुरुवारी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आली.

गुरुवारी पहिल्या पौर्णिमेलाच बाहेर गावच्या भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. श्री येडेश्वरी देवीच्या नारळी पौर्णिमा उत्सवाचे विशेष महत्त्व असुन, येडेश्वरी देवीच्या मंदिर स्थापनेबाबत आबाजी पाटील यांच्या आख्यायिकेनुसार आबाजी पाटील यांनी त्यांचे कुलदैवत माहूर येथील रेणुका देवी असल्याने त्यांनी कुलदेवतेचे दर्शन सुलभ व्हावे म्हणुन माहूरगड प्रमाणे गावातील एका डोंगरावर देवीचे मंदिर बांधले. माहूरगड प्रमाणे एकमुखी दत्त मंदिर, कल्लोळची स्थापना केल्याचे सांगितले जाते. त्यामुळे नारळी पौर्णिमा मोहत्सव पाटील घराण्याशी निगडित मनाला जातो.

श्री. येडेश्वरी देवीच्या पालखीचे गुरुवारी पाटलाच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आगमन झाले. दहीहंडीसह नारळी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला गाव प्रदक्षिणासाठी सायंकाळी पाच वाजता पालखीचे आगमन झाले.

शुक्रवारी गावातील तसेच पंचक्रोशीतील भाविक विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आलेल्या देवीच्या पालखीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. सकाळी पालखी अकरा वाजता दहीहंडीसह गाव प्रदक्षिणेसाठी टाळकरी, आराधींच्या जांज,टाळ मृदगाच्या गजरात गाजत विठ्ठल रुक्मिणी मंदिरा मागुन,माणिक चौक,बरे यांच्या शेतातून गावाला गावप्रदक्षिणा करुन कवड्याच्या अंब्याच्या झाडापासून मुख्य येडेश्वरी मंदिर रस्त्याला वरुन पालखी, मुख्य मंदिराकडे दहीहंडीसह निघते. मुख्य मंदिराजवळ पायथ्याशी पोहोचल्यानंतर चिंचेच्या झाडावर दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम पार पडणार आहे. दुसऱ्या दिवशी शनिवारी पालखी पुन्हा नगर प्रदक्षिणेसाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात येऊन रविवारी (ता.30) पालखीची वाजत गाजत नगर प्रदक्षिणा, गावातील मुख्य चौका चौकातून मिरवत अकरा वाजता पाटलाच्या वाड्यात सोंग,भारुड,पालखीची आरती,वाड्यात पालखी येण्यापूर्वी वाड्यात गावातील महिलांची मंगळागौर खेळण्यासाठी गर्दी असते.

वाड्यातून पालखी पुन्हा मिरवत गुरव गल्ली, बाजार चौकातून विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आल्यानंतर हरिणाम सप्ताहातील टाळकरी, मृदंगाचार्य, सेवेकरी, कीर्तनकार प्रवचनकार यांचा सत्कार समारंभ, विठ्ठल रुक्मिणी, देवीच्या पालखीची आरती नंतर महाप्रसादाने नारळी पौर्णिमा यात्रेची सांगता होईल.


 
Top