परंडा (प्रतिनिधी)- भोत्रा (ता. परंडा, जि.धाराशिव) येथील ग्रामस्थांनी गावात सायंकाळी होणारे भारनियमन (लोडशेडिंग) तात्काळ बंद करून ते दिवसा करण्यात यावे, या मागणीसाठी महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर केले आहे. सध्या गावात दररोज सायंकाळी 6:45 ते रात्री 9:30 या वेळेत वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे ग्रामस्थांनी निवेदनात नमूद केले आहे.
ग्रामस्थांनी सांगितले की, सायंकाळची वेळ ही विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी, नागरिकांच्या दैनंदिन कामकाजासाठी, दुकाने व व्यावसायिक आस्थापनांच्या व्यवहारासाठी तसेच घरगुती कामांसाठी अत्यंत महत्त्वाची असते. अशा वेळी वीजपुरवठा बंद होत असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक तयारीवर परिणाम होत असून पिण्याच्या पाण्याच्या मोटारी, घरगुती उपकरणे, लहान उद्योग-व्यवसाय आणि इतर आवश्यक कामेही ठप्प होत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
निवेदनात महावितरण प्रशासनाने सायंकाळी होणारे 6:45 ते 9:30 या वेळेतील भारनियमन रद्द करून ते दिवसा योग्य वेळेत करण्याची मागणी करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास अबाधित राहील, नागरिकांची दैनंदिन कामे सुरळीत होतील आणि गावकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, असे ग्रामस्थांनी नमूद केले आहे. महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यांनी या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून भोत्रा गावातील सायंकाळचे लोडशेडिंग तात्काळ दिवसा करण्याबाबत आवश्यक आदेश द्यावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
या निवेदनावर धनंजय गोफणे, संतोष गोफणे, लिंबराज गोफणे, सुनील सल्ले, समाधान कोकाटे, कुलदीप देशमुख, अजित शिंदे, करणसिंग कंचे, अशोक सल्ले आणि सुजित मोहिते यांच्यासह भोत्रा गावातील समस्त ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत. गावाच्या हितासाठी आणि नागरिकांच्या सोयीसाठी महावितरणने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
