धाराशिव (प्रतिनिधी)- समाजाने विवेकशील  सामाजिक बदल स्विकारणे अपरिहार्य आहे. परंतु ते बदल स्विकारताना सामाजिक विवेक जागृत ठेवणे आवशयक आहे, असे मत प्रदेश माहेश्वरी महिला संघटनमंत्री ॲड. दिपा बियाणी यांनी व्यक्त केले.

महेश नवमीनिमित्त शहरातील बालाजी मंदिरात मंगळवार, 23 जून रोजी प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी माहेश्वरी समाजाच्यावतीने उत्पत्ती दिवस म्हणजेच महेश नवमी साजरी करण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश महिला संघटनेच्या सचिव अनिता मालू, प्रदेश सभेचे माजी अध्यक्ष श्रीकिशन भन्साळी, जिल्हा सभेचे अध्यक्ष जुगलकिशोर लोया, सचिव श्याम भन्साळी, महिला संघटनेच्या अनुराधा सारडा, सचिव प्रिया मंत्री, जिल्हा युवा संघटनेचे अध्यक्ष श्रीकृष्ण मुंदडा, सचिव गोकुळ बांगड, तालुका सभेचे अध्यक्ष चेतन भन्साळी, योगेश सारडा, अमरनाथ सारडा यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना बियाणी म्हणाल्या की, माहेश्वरी समाजाकडे इतर समाज अत्यंत आदराने पाहतो. समाजाची वेगळी ओळख आहे, ती आपण जपायला हवी. सध्या जग नाविन्यतेकडे ओढले जात आहे. परंतु नाविन्यता स्विकारताना विवेकशील रहायला हवे. सध्याच्या युगात संपत्ती एवढेच संस्कारालाही अत्यंत महत्व आहे. अयोग्याचे पतन आणि योग्यतेचे जतन करताना समाजातील नकारात्क विषयावर चर्चा करण्यापेक्षा सकारात्मक कृती आणि विचार करणो आवश्यक आहे.

यावेळी प्रदेश महिला सभेच्या सचिव अनिता मालू म्हणाल्या की, सध्याच्या काळात संयम हा फार महत्वाचा आहे. खास करून तरूण पिढीने संयमाचा अंगीकार करायलाच हवा. समाज निर्माणाच्या कार्यात केवळ चर्चा न करता त्यावर अंमल करणो गरजेचे आहे. आपल्या समाजाची मुख्य ओळख व्यापार, इमानदारी, संस्कारीत जीवन ही आहे. ती आपण संयुक्त परिवाराच्या माध्यमातून पुढे आणायला हवी.

यावेळी प्रदेश सभेचे माजी अध्यक्ष श्रीकिशन भन्साळी व पुनम तापडिया यांचेही प्रेरक मार्गदर्शन झाले. प्रास्ताविक जुगलकिशोर लोया व अनुराधा सारडा यांनी केले. सात दिवस चालणाऱ्या या महेश नवमी उत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, विविध खेळांच्या स्पर्धा, समाजातील विविध स्तरातील गुणवंतांचा सत्कार, सहभोजन या व अन्य स्पर्धांचे आयोजन केले जाते. दरम्यान सकाळी शहरातून शिस्तबध्द शोभायात्रेचे आयोजन करून भगवान शंकराची रथात मिरवणूक काढली जाते. दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात केली जाते. यावेळी उदयोन्मुख युवती कलाकार राजेश्वरी सारडा, राशी मिनियार, निशा खंडेलवाल यांनी आपल्या मनमोहक नृत्यातून महेश वंदना प्रस्तुत केली. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंदा मोदाणी, चेतन नोगजा यांनी तर आभार श्याम भन्साळी यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जगदीश मोदाणी, मुरलीधर चांडक, हरिश सारडा, सचिन बांगड, सागर चांडक, विनय सारडा यांनी परिश्रम घेतले.

 
Top