धाराशिव (प्रतिनिधी)- पत्रकारांना शिवीगाळ करून मारहाणीची धमकी दिल्याचा आरोप असलेल्या खासदार संजय दिना पाटील यांच्या वर्तनाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)चे धाराशिव जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी तीव्र शब्दांत जाहीर निषेध केला आहे. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून त्यांच्याशी अशा प्रकारची अरेरावी आणि धमकीची भाषा करणे अत्यंत निंदनीय असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लोकप्रतिनिधींनी लोकशाही मूल्यांचा आदर राखणे अपेक्षित असताना पत्रकारांना शिवीगाळ करणे आणि मारण्याची धमकी देणे हे अत्यंत गंभीर स्वरूपाचे कृत्य आहे. अशा घटनांमुळे पत्रकारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊन अभिव्यक्ती स्वातंत्र्यालाही बाधा पोहोचू शकते.
पत्रकारांवरील कोणत्याही प्रकारच्या दबावाचे किंवा धमकीच्या राजकारणाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) समर्थन करणार नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी करून खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी केली आहे.लोकशाही व्यवस्थेत प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य अबाधित राखणे ही शासन व प्रशासनाची जबाबदारी असून, पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी कठोर पावले उचलावीत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
