धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यात विकास,डिजिटल परिवर्तन, उद्योगवाढ,आरोग्य सुविधा आणि लोककल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे प्रगतीचा नवा अध्याय सुरू झाला आहे. शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे जीवन अधिक सुलभ,सुरक्षित आणि सन्मानपूर्ण बनत असून ‘समृद्ध, सक्षम आणि आत्मनिर्भर महाराष्ट्र’ घडविण्याच्या दिशेने धाराशिव जिल्हा वेगाने पुढे जात असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.
आज 1 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात 67 व्या महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्ताने मुख्य शासकीय राष्ट्रध्वजारोहण केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना सरनाईक बोलत होते. यावेळी स्वातंत्र्य सैनिक भास्करराव नायगावकर, बुबा साहेब जाधव, कलावती उमरे, भागीरथी कुकडे, भागीरथी गुरव,जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चना पाटील,उपाध्यक्षा उषा गायकवाड,महिला व बाल कल्याण समिती सभापती पूजा शिंदे, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाडदाळकर,पोलिस अधीक्षक रितू खोखर,अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना,जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश काळे यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी यांची उपस्थिती होती.
जिल्ह्यात शासनाच्या विविध लोकाभिमुख योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचे सांगून सरनाईक म्हणाले की, प्रशासनात डिजिटल परिवर्तनामुळे नागरिकांना अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक सेवा उपलब्ध होत आहेत. ‘डिस्ट्रिक्ट डॅशबोर्ड’,‘कल्पवृक्ष स्मार्ट जीआर’,‘जीवनरेखा’ आणि ‘तुळजाई चॅटबॉट’ यांसारख्या नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे जमिनीचे दाखले, विविध प्रमाणपत्रे, तक्रार निवारण आणि शासकीय योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत अधिक सुलभतेने पोहोचत आहे. परिणामी वेळ,श्रम आणि आर्थिक खर्चात मोठी बचत होत आहे.औद्योगिक क्षेत्रात जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून गुंतवणूक वाढीस लागली असून हजारो रोजगार संधी निर्माण होत आहेत.विविध औद्योगिक क्लस्टर प्रकल्पांमुळे ‘आत्मनिर्भर धाराशिव’ या संकल्पनेला अधिक बळ मिळत असल्याचे ते म्हणाले. जिल्हाधिकारी कार्यालयातील कार्यक्रमस्थळी आगमन होताच प्रारंभी पालकमंत्री श्री.सरनाईक यांनी राष्ट्रध्वजारोहण केले.पोलिस पथकाने राष्ट्रगान,राष्ट्रगीत व राज्यगीत सादर केले व राष्ट्रध्वजास मानवंदना दिली.पालकमंत्री व मान्यवरांनी शहीद स्मृती स्तंभाला पुष्पचक्र वाहिली.
