भूम (प्रतिनिधी)- भूम शहरातील रविंद्र हायस्कूल, भूम येथील पर्यवेक्षक धनंजय पवार सर यांनी तब्बल ३५ वर्षांची प्रदीर्घ व उल्लेखनीय शैक्षणिक सेवा पूर्ण करून नुकतेच सेवानिवृत्ती स्वीकारली. संस्थेच्या चारही शाखांमध्ये प्रामाणिकपणे सेवा बजावत विद्यार्थ्यांमध्ये आदराचे स्थान निर्माण करणारे विद्यार्थीप्रिय व शिस्तप्रिय शिक्षक म्हणून त्यांची ओळख राहिली.
पवार सर वेळेचे अत्यंत काटेकोर पालन करणारे तसेच शालेय प्रशासनातील कोणतेही काम आवडीने व जबाबदारीने पार पाडणारे अधिकारी म्हणून ओळखले जात होते. शाळेतील तसेच प्रशालेबाहेरील अधिकृत कामेही त्यांनी आपल्या अनुभव व संपर्काच्या जोरावर अल्पावधीत पूर्ण करून संस्थेचा कार्यभार सक्षमपणे सांभाळला. त्यांच्या सेवानिवृत्तीमुळे विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी भावूक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
शालेय कार्यासोबतच पवार सरांनी आपल्या एकत्र कुटुंब व्यवस्थेलाही तेवढेच महत्त्व दिले. चारही भावांचे एकत्र कुटुंब आजही गुण्यागोविंदाने नांदत असून त्यांनी पाच मुलींचे विवाह यशस्वीरीत्या पार पाडले आहेत. पुढील काळात चार मुलांचे विवाहही एकत्र कुटुंब पद्धतीतच होणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. त्यांच्या कुटुंबात पत्नी, आई, मुलगा, तीन भाऊ, भावजया, पाच मुली, पाच जावई व चार मुले असा मोठा परिवार आहे.
सेवानिवृत्ती निमित्त प्रशालेत आयोजित सत्कार समारंभात संस्थेचे सचिव आर. डी. सुळ साहेब, मुख्याध्यापक उत्तम सुरवसे सर, उपमुख्याध्यापिका शर्मिला पाटील मॅडम, पर्यवेक्षक मिलिंद लगाडे सर, भागवत लोकरे सर, रविंद्र प्राथमिकचे मुख्याध्यापक लक्ष्मण देशमुख सर तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी पवार सरांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या पुढील आयुष्यासाठी निरोगी व सुखसमृद्ध जीवनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी कुटुंबीयांच्यावतीनेही त्यांचा सत्कार करण्यात आला. जावई पंकज खंडागळे, प्रशांत खंडागळे, मंगेश काशीद, गुरुप्रसाद चौधरी, गणेश राऊत तसेच माने सर, राऊत साहेब, चौधरी साहेब आदी नातेवाईक उपस्थित होते.
