धाराशिव  (प्रतिनिधी)- धाराशिव- लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी ॲड. व्यंकटराव गुंड पाटील यांनी पक्षश्रेष्ठींकडे अधिकृतपणे उमेदवारीची मागणी केली आहे. तसेच, त्यांनी आ. रविंद्र चव्हाण (प्रदेशाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य), देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) व ना. चंद्रशेखर बावनकुळे (मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्याकडेही उमेदवारी मिळावी यासाठी मागणी केल्याची माहिती समोर आली आहे.

धाराशिव प्रदेश कार्यकारिणी सदस्य तसेच रूपामाता उद्योग समूहाचे संस्थापक म्हणून ॲड. गुंड पाटील यांची ओळख आहे. पाडोळी (आ.) या गावातून उभा राहिलेला गुंड परिवार गेल्या चार दशकांपासून शैक्षणिक, सामाजिक, औद्योगिक आणि राजकीय क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारात घडलेले ॲड. गुंड यांनी विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांसारख्या संघटनांमध्ये सक्रिय भूमिका बजावली आहे. त्यांनी 1977 साली पुणे येथे प्रथम वर्ग, तर 1984 साली नाशिक येथील केटीएचएम महाविद्यालयात प्रथम व द्वितीय वर्षे स्वयंसेवक प्रशिक्षण पूर्ण केले आहे. सध्या ते भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.

गुंड कुटुंबाची राजकीय परंपरा देखील भक्कम आहे. त्यांच्या ज्येष्ठ बंधूंनी सरपंच, जिल्हा परिषद सदस्य व धाराशिव जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदांवर काम केले असून, पत्नी सुलभा व्यंकट गुंड पाटील यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून यशस्वी कारकीर्द केली आहे. कुटुंबातील इतर सदस्यांनीही विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करत विकास प्रक्रियेला गती दिली आहे. स्वतः ॲड. व्यंकटराव गुंड पाटील यांनी अनेक वर्षे सरपंच तसेच गृहरक्षक दलाच्या जिल्हा समादेशक पदावर कार्य करत प्रशासनिक अनुभव मिळवला आहे.

औद्योगिक क्षेत्रात त्यांनी उभारलेला रूपामाता उद्योग समूह हा परिसरातील शेतकरी, कामगार व बेरोजगारांसाठी आधारवड ठरत आहे. सहकार, बँकिंग, शिक्षण, दुग्ध व्यवसाय व सामाजिक क्षेत्रात त्यांनी उभारलेले विस्तृत जाळे धाराशिव, लातूर व बीड जिल्ह्यांत पसरले असून, यामुळे ऊस व दुग्ध प्रश्न सोडविण्यासोबतच युवकांच्या रोजगार निर्मितीस चालना मिळाली आहे.

विशेष म्हणजे, तुळजापूर विधानसभा मतदारसंघात 2019 तसेच 2024 च्या निवडणुकांमध्ये ॲड. व्यंकटराव गुंड पाटील हे प्रबळ दावेदार म्हणून समोर आले होते. मात्र, त्या काळातील काही राजकीय समीकरणांमुळे पक्षाकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही. त्या वेळी पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या कार्याची दखल घेत भविष्यात निश्चित संधी देण्याचा शब्द दिला होता. त्यामुळेच आता विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेली उमेदवारीची मागणी अधिक महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

 
Top