धाराशिव (प्रतिनिधी)-  विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक-2026 च्या पार्श्वभूमीवर नामनिर्देशनपत्र दाखल करताना उमेदवारांनी कोणती कार्यपद्धती अवलंबावी,याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी आदेश जारी केले आहेत.निवडणूक प्रक्रिया शांततेत,निर्भय व न्याय वातावरणात पार पडावी,या उद्देशाने हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.भारत निवडणूक आयोगाने 18 मे 2026 रोजी उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून,त्याच दिवसापासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.

या निवडणुकीच्या काळात उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करताना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात वाहनांच्या ताफ्यात तीनपेक्षा अधिक मोटारगाड्या,मोटारसायकली किंवा अन्य वाहनांचा समावेश करता येणार नाही,असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी उमेदवारांसोबत केवळ पाच व्यक्तींनाच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात प्रवेश दिला जाईल.याव्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या 100 मीटर परिसरात कोणत्याही प्रकारची मिरवणूक,सभा, घोषणा,वाद्य वाजविणे,गाणी म्हणणे किंवा निवडणूक प्रचार करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून हे आदेश जारी केले आहेत.संबंधित सर्वांना नोटीस देऊन म्हणणे ऐकून घेणे सध्याच्या परिस्थितीत शक्य नसल्याने एकतर्फी आदेश काढणे आवश्यक असल्याची खात्री झाल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. हे आदेश 25 जून 2026 पर्यंत धाराशिव,लातूर आणि बीड जिल्ह्यात लागू राहणार आहेत.निवडणूक प्रक्रिया पारदर्शक,शांततापूर्ण आणि कायदा- सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाने ही पावले उचलली आहे.

 
Top