तुळजापूर (प्रतिनिधी)- उन्हाळी सुट्ट्या पार्श्वभूमीवर - अक्षय तृतीया दिनापासुन शहरात गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने शहरवासीयांसह भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शहरात येणाऱ्या भाविकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी उपलब्ध नसल्याने बाटलीबंद पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. स्थानिक नागरिकांनाही गढूळ पाण्यामुळे त्रास सहन करावा लागला. गढूळ पाण्यामुळे पोटाचे आजार, संसर्गजन्य रोग होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
यापूर्वीही शहरात गढूळ पाणीपुरवठा झाल्यानंतर नगरपरिषदेकडून उपाययोजना करण्यात आल्या होत्या. मात्र, पुन्हा त्याच समस्या उद्भवल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. जलशुद्धीकरण केंद्रात टाक्या स्वच्छ करूनही गढूळ पाणी येत असल्याने तुरटीसह शुद्धीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांच्या दर्जावर प्रश्न उपस्थित होत आहेत. नागरिकांनी दर्जेदार रसायनांचा वापर करून पाणी शुद्ध करावे, अशी मागणी केली आहे. अशा परिस्थितीत गढूळ पाणीपुरवठा सुरूच राहिल्यास परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे.
