धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, गट कार्यालय लातूर, छत्रपती संभाजीनगर विभागाच्या वतीने कामगार कल्याण भवन, धाराशिव येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त भीम गीतांचा विशेष कार्यक्रम उत्साहात पार पडला. सामाजिक सलोखा आणि डॉ. आंबेडकरांच्या विचारांचे स्मरण या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला कामगार आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.कार्यक्रमाची सुरुवात स्वतंत्र मजूर जनरल कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. आनंद भालेराव यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा. बाळासाहेब माळी तसेच राजू सय्यद हे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी डॉ. बाबासाहेबांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि कामगार चळवळीतील योगदानाचा गौरव करत त्यांच्या विचारांवर प्रकाश टाकला.यानंतर त्रिशरण गायन पार्टीच्या वतीने अर्जुन धावारे, दिलीप लांडगे, पांडू ओहाळ आणि मंगल कांबळे यांनी भीम गीतांचे प्रभावी सादरीकरण केले. त्यांच्या सुमधुर आवाजातील गीतांनी संपूर्ण सभागृह भारावून गेले. भीम गीतांच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला आणि विचारांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद देत डॉ. आंबेडकरांविषयीचा आदर व्यक्त केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्र महिला सहायिका मनिषा भंडगे मॅडम यांनी केले. या कार्यक्रमामुळे उपस्थितांमध्ये डॉ. बाबासाहेबांच्या विचारांची नव्याने प्रेरणा निर्माण झाली असून सामाजिक एकात्मतेचा संदेशही देण्यात आला.
