तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील गंजेवाडी येथे एका शेतकऱ्याच्या 17 पैकी 11 शेळ्यांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना शुक्रवार दिनांक 3 एपिल रोजी सकाळी उघडकीस आली. सहा शेळ्या गंभीर जखमी झाले आहेत.
गंजेवाडी येथील शेतकरी महावीर मारुती गंजे हे आपल्या शेतात शेळीपालन व्यवसाय करीत असुन शुक्रवार (दि. 3) रोजी सकाळी ते शेतात आले असता शेडमधील 11 शेळ्या मृत अवस्थेत आढळल्या. तर 6 शेळ्या जखमी अवस्थेत असल्याचे दिसून आले. याप्रकरणी पशुपालक शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली असून आपल्या पशुंबाबत त्यांच्या चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सदरील शेळ्या या सुमारे एक लाख दहा हजार रुपयांच्या असल्याचे समजते. याच शेतकऱ्याचे लाखो रुपये नुकसान झाल्याने शासनाने शेतकऱ्याला मदत करावी अशी मागणी होत आहे. सध्या तरी या या शेळ्यांचा कशामुळे मृत्यू झाला याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. सदरील मयत शेळ्यांचे सॅम्पल घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून त्यांचा अहवाल आल्यानंतर या शेळ्यांचा मृत्यू नेमका कशाने झाला हे स्पष्ट होणार आहे.
