धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील तमाशा कला केंद्र बंद करण्यात आले असून, कला केंद्रातील महिलांसाठी शासनाच्या अनेक उपजिविकाच्या योजना आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी दिली आहे.
राज्यात धाराशिव जिल्हा अनेक शासकीय योजनेत प्रथम व द्वितीय आल्याबद्दल आणि उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून जिल्ह्याला पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांचा व निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांचा पत्रकारांच्यावतीने सोमवार दि. 20 एप्रिल रोजी सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी पुजार यांनी तमाशा कला केंद्र मुक्त जिल्हा करण्यासाठी मंत्री, राजकीय नेते व पत्रकारांनी मोठे सहकार्य केले आहे. कला केंद्रातील महिलांसाठी अनेक शासकीय योजना असल्याची माहिती त्या महिलांना देण्यात आली आहे. ऐवढेच नाहीतर प्रशासन शासकीय योजनेमधील विविध उद्योगासाठी बँकेचे लोन देण्याच्या प्रयत्न करत आहे. त्यामुळे तमाशा कला केंद्र बंद पडले म्हणजे आमचे उपजिविकेचे साधन गेले असे त्या महिलेने म्हणून नये. असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
यावेळी जेष्ठ पत्रकार राजाभाऊ वैद्य, संतोष जाधव, हुंकार बनसोडे, सज्जन यादव, अमजद सय्यद, प्रशांत कावरे, प्रमोद राऊत, गणेश जाधव, सचिन चंदनशिवे, सुभाष कदम आदी उपस्थित होते.
भोगावती नदीकडे लक्ष देणार
यावेळी पत्रकारांनी दरवर्षी भोगावती नदीतील कचरा, गाळा काढण्याच्या नावाने नगर परिषद मोठ्या प्रमाणात खर्च करते. परंतु दरवर्षी भोगावती नदीची परिस्थिती जैसे तेच राहत आहे. कारण शहरातील नाल्याचे पाणी भोगावती नदीमध्ये जात असल्यामुळे नदीच्या पात्रात अस्वच्छता असते. त्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी जो डीपीआर तयार केला होता त्या डीपीआरची अंमलबजावणी केल्यास भोगावती नदी पात्र स्वच्छ राहिल. त्यामुळे शहराच्या सौदर्यात भर पडेल असेही पत्रकारांनी सांगितले. यावर जिल्हाधिकारी पुजार यांनी सदर डीपीआरची माहिती घेवून काम करू, त्याप्रमाणे त्या भागात वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात करण्यासाठी सामाजिक संस्थेने पुढाकार घ्यावा, असेही सांगितले.
