धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव, लातूर, आणि बीड जिल्ह्यातील खरीप 2025 च्या पीक विम्याबाबत असलेल्या तांत्रिक अडचणी आणि विमा कंपन्यांचे आक्षेप लवकरच मार्गी लागणार आहेत. या प्रक्रियेची सुनावणी झाली आहे. येत्या दोन-तीन दिवसांत याबाबत सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा पेच सुटणार असून, धाराशिव, लातूर आणि बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना लवकरच दिलासा मिळणार असल्याचा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.
याबाबत जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसोबत समाजमाध्यमावरून संवाद साधताना आमदार पाटील यांनी सांगितले की, विमा कंपन्यांनी काही तांत्रिक मुद्द्यांवर आक्षेप घेतल्यामुळे पीक विम्याची प्रक्रिया रखडली होती. सुरुवातीला जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावर हे आक्षेप फेटाळण्यात आले होते. मात्र त्यानंतर हे प्रकरण कृषी सचिवांच्या स्तरावर गेले. कृषी विभागाचे प्रधान सचिव परिमल सिंग हे निवडणूक कर्तव्यावर असतानाही, त्यांना आपण शेतकऱ्यांच्या वतीने व्यक्तिशः केलेल्या विनंतीला मान देत त्यांनी मागील आठवड्यात या प्रकरणाची ऑनलाईन सुनावणी घेतली आहे. येत्या मंगळवार पर्यंत यावर अंतिम निकाल लागण्याची शक्यता असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.
सन 2020 आणि 2021 सालच्या प्रलंबित पीक विम्याबाबतही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी नुकतीच दिल्ली येथे केंद्र सरकारचे जेष्ठ विधीज्ञ ऍड बलबीर सिंग आणि आपले जेष्ठ विधिज्ञ ऍड सुधांशु चौधरी यांच्यासह याप्रकरणी काम करणारी लीगल टीम यांच्याशी चर्चा करून याबाबत रणनीती आखण्यात आली आहे.
