तुळजापूर (प्रतिनिधी)- तीर्थक्षेत्र तुळजापूर नगरीतील नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर 156 कोटी रुपयांच्या रस्ते कामांवर संशयाचे सावट निर्माण झाले आहे. विरोधकांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे हे काम सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.
शहरात वर्षभर कोट्यवधी भाविक येत असताना मंदिर परिसरातील रस्ते निकृष्ट व अतिक्रमणग्रस्त, दाट लोकवस्तीतील रस्ते दुरवस्थेत अशा स्थितीत खाजगी विकासकांच्या प्लॉटिंग भागात रस्ते कामे करण्यात येत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे “मंदिर परिसर जुने तुळजापूर भकास, बाहेरचे रस्ते झकास” अशी प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे.
महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत आरोप केला की, नगरोत्थान निधीचा वापर लोकवस्तीऐवजी निर्जन भागात केला जात आहे. खाजगी प्लॉटिंगमध्ये रस्ते बांधणे हे नियमबाह्य आहे. विकासकांनी स्वतः करायची कामे शासकीय निधीतून केली जात आहेत. यामुळे शासकीय निधीचा गैरवात वापर होतो असा आरोप केला जात आहे. नियम काय सांगतो तर नगर विकास विभागाच्या नियमानुसार खाजगी प्लॉटिंगमधील रस्ते, पायाभूत सुविधा विकासकाने स्वतः करणे बंधनकारक शासकीय निधीचा वापर सार्वजनिक वस्ती आणि गरज असलेल्या भागात करणे अपेक्षित मात्र प्रत्यक्षात याच्या उलट कामे होत असल्याचा आरोप आहे.
या विकासकामांमुळे खाजगी प्लॉटिंगला मोठा फायदा होत असुन 1 हजार रुपये दर हजारवर जावुन प्लॉटचे दर गगनाला भिडल्याची चर्चा आहे. यामुळे ही कामे भाविकांसाठी की विकासकांसाठी?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी मागणी केली आहे. संबंधित कामांची सखोल चौकशी व्हावी, आर्थिक व्यवहारांची पडताळणी करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी.
हार-फेट्यांऐवजी शालेय साहित्य भेट; बदलत्या परंपरेला प्रतिसाद
तुळजापूर (प्रतिनिधी)- परंपरागत सत्कार पद्धतीला छेद देत “सत्कार शिक्षणासाठी” या अभिनव उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असून, या उपक्रमाला कार्यकर्ते व नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार, अपसिंगा येथील सामाजिक कार्यकर्ते अमीर शेख यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट दिली असता हार-फुले न देता वही, पेन, दप्तर यांसारखे शालेय साहित्य देऊन सत्कार करण्यात आला. हा सत्कार केवळ औपचारिकता नसून “शिक्षणाला दिलेली मोलाची साथ” असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. परंपरेप्रमाणे हार, फेटे, बुके आणि महागड्या शाली देण्याऐवजी शालेय साहित्य देऊन गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला आहे. सत्कारासाठी होणाऱ्या खर्चातून जमा होणारे साहित्य जिल्हा परिषद व नगर परिषद शिक्षण विभागामार्फत गरजू व होतकरू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले जाणार आहे. असून जिल्हाभरातील सत्कार सोहळे आता “ज्ञानयज्ञ” ठरू लागले आहेत.
