धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा उद्योग केंद्राने सन 2025-26 या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या महत्त्वाकांक्षी योजनेत 130 टक्के उद्दिष्ट पूर्ण करत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.हे यश जिल्हाधिकारी यांच्या कुशल मार्गदर्शनामुळे शक्य झाल्याचे जिल्हा उद्योग केंद्राकडून सांगण्यात आले.या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत उद्योजकतेला चालना देण्यात आली.
जिल्हाधिकाऱ्यांनी वेळोवेळी घेतलेल्या आढावा बैठका,नियोजनबद्ध कार्यपद्धती आणि प्रशासनातील समन्वय यामुळे संपूर्ण यंत्रणेला नवी दिशा मिळाली.विशेषतः प्रलंबित प्रकरणांच्या जलद मंजुरीसाठी बँक अधिकाऱ्यांसमवेत घेण्यात आलेल्या बैठका आणि दिलेले स्पष्ट निर्देश यामुळे कर्जमंजुरी प्रक्रियेतील अडथळे दूर झाले.परिणामी,अनेक प्रस्तावांना वेळेत मंजुरी मिळून लाभार्थ्यांना उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक आर्थिक पाठबळ मिळाले.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना केवळ कर्जपुरवठ्यापुरती मर्यादित नसून,ग्रामीण व शहरी भागातील तरुणांना उद्योग उभारणीसाठी प्रोत्साहन देणारी एक प्रभावी संधी आहे.या माध्यमातून स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती वाढून आर्थिक विकासाला गती मिळत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या कृतिशील व संवेदनशील दृष्टिकोनामुळे जिल्ह्यातील शेकडो होतकरू युवक-युवतींच्या उद्योजक होण्याच्या स्वप्नांना बळ मिळाले असून, रोजगार निर्मिती क्षेत्रात जिल्ह्याने नवा आदर्श निर्माण केला आहे. या यशाबद्दल जिल्हा उद्योग केंद्र व खादी ग्रामोद्योग विभागाच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे विशेष आभार व्यक्त केले आहेत.
