धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना 2020 साल खरीप हंगामातील पीक विमा परताव्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. राज्य शासनाच्या कृषी विभागाने मंगळवार 24 मार्च रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. पात्र शेतकरी बांधवांना नुकसान भरपाईचे वाटप करण्यासाठी वैयक्तिक ठेव खाते उघडण्यास विशेष बाब म्हणून आपल्या महायुती सरकारने आता मान्यता दिली आहे. जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी हा मोठा दिलासादायक निर्णय असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.
खरीप 2020 च्या पीक विम्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, शेतकऱ्यांना विम्याची रक्कम अदा करण्यासाठी धाराशिवच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या नावाने स्वतंत्र खाते उघडण्याची आवश्यकता होती.
134 कोटींहून अधिकचा निधी आपल्या महायुती सरकारने उपलब्ध करुन दिला आहे. जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा करण्यासाठी शासनाने निधीची व्यवस्था केली आहे. त्यानुसार प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा प्रलंबित राज्य हिस्सा म्हणून 134 कोटी 11 लाख 91 हजार 938 रुपये वितरित करण्यात आले आहेत. न्यायालयाकडून मिळालेली व्याजासह रक्कम देखील याच खात्यात जमा केली जाणार असल्याचे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.
