मुरूम (प्रतिनिधी)- केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार असे पर्यंत लाडकी बहीण योजना चालू राहणार आहे. आत्ता सरकारने लखपती दीदी ही महत्वाकांक्षी योजना राबविण्यासाठी तयार झाले असून धाराशिव जिल्ह्यातील सर्व नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील महिलांना लखपती करण्याचा संकल्प करावा. देशातील आणि राज्यातील सरकार शेतकऱ्यांना मोफत वीज देणार असून दिवसा आणि रात्री वीजपुरवठा करून शेती सुजलाम सुफलाम होणार असून ग्रामीण भागातील जनतेनी महायुतीच्या उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
उमरगा-लोहारा तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ तालुक्यातील कोराळ मोड वर सोमवारी दि. 2 फेब्रुवारी रोजी आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. या वेळी माजी मंत्री बसवराज पाटील, मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगावे, आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हा अध्यक्ष दत्ता कुलकर्णी, मुरूमचे नगराध्यक्ष बापूराव पाटील, उमरगा जनता बँकेचे चेअरमन शरण पाटील, रामकृष्णपंत खरोसेखर, दिलीप भालेराव, संताजी चालुक्य, प्रकाश आष्टे, माधव पवार, रशीद शेख, कैलास शिंदे, शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष मोहन पनुरे, बलभीमराव पाटील आदींसह सर्व उमेदवार उपस्थित होते.
पुढे बोलताना बावनकुळे म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांच्या 55 योजना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपल्या भागत येणार आहेत.जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून ओबीसी, एस.सी., बंजारा, मराठा समाजाच्या कल्याणासाठी कमळा समोरील बटन दाबून विकासाला मतदान करावे असे आवाहन त्यांनी केले. विकसित महाराष्ट्र करण्याचा संकल्प देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. देशातील नरेंद्र मोदी सरकारने एक लाख कोटी रुपये महाराष्ट्र राज्याला देणार असून उमरगा तालुक्यातुन गेलेला राष्ट्रीय महामार्ग हाय स्पीड हायवेला जोडला जाणार आहे. शेतकऱ्यांच्या नदी नाल्यातील वाहून जाणारे पाणी फिरवून आणून शेतकरी बांधवांना देणार आहोत.
सर्व शेतकऱ्यांचे कर्जमाफ करणार असून, नव्याने स्मार्ट व्हिलेज संकल्पना राबवून ग्रामीण भागाचा कायापालट करणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा नेते शरण पाटील यांनी केले. त्यानीं महसूल विभागाच्या वतीने चालवलेल्या शेत रस्ते योजनेमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठी मदत झाली असल्याचे सांगितले.
या वेळी माजी मंत्री बसवराज पाटील म्हणाले की, धाराशिव, लातूर हे दोन भावंडे आहेत. या जिल्ह्यात परिषदेच्या अध्यक्षपदी महायुतीचा अध्यक्ष बसवनार असून, पक्षाच्या आदेशानुसार शरण पाटील यांची उमेदवारी मागे घेऊन सर्व सामान्य कार्यकर्त्याला संधी दिली असल्याचे ते म्हणाले. या वेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी महायुती सरकार मोठ्या ताकदीने काम करीत असल्याचे सांगितले. राज्यात व केंद्रात मोठी विकासाची पर्वणी होत आहे. पायाभूत सुविधेसाठी बारा लाख कोटी निधी मिळणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 21 टीएमसी हक्काचे पाणी आणण्यासाठी महायुती सरकारने निर्णय घेतले. सात टीएमसीला मंजुरी मिळाली आहे. हे पाणी रामदऱ्यात येणार आहे. तिथून तुळजापूर, लोहारा, उमरगा तालुक्यात हे पाणी येणार आहे. तुळजापूर देवी मंदिर विकासासाठी दोन हजार कोटी मंजूर झाले आहेत. शिर्डीच्या धर्तीवर विकास होणार असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरण पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. शौकत पटेल यांनी केले. सभेपुर्वी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
