धाराशिव (प्रतिनिधी)- शालेय शिक्षण विभाग व महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्या वतीने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांतील शाळांमध्ये मुलींसाठी राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा अभियानांतर्गत प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणामध्ये मुलींना स्व संरक्षणासाठी आवश्यक विविध प्रकारातील प्रशिक्षण प्रशिक्षक मार्फत देण्यात येत आहे. राज्यातील मुलींना प्रशिक्षण देणाऱ्या या प्रशिक्षकांनी अधिकाधिक अद्यावत व परिपूर्ण प्रशिक्षण देता यावे, यासाठी राज्यभरातील महिला प्रशिक्षकांची कार्यशाळा अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील आत्मा मलिक इंटरनॅशनल स्कूल कोकमठाण येथे,आयोजित करण्यात आली होती. हे प्रशिक्षण शिबिर 17 व 18 फेब्रुवारी ला पूर्ण झाले. प्रशिक्षणात राज्यभरातील 5 हजार महिला प्रशिक्षक सहभागी झाले होते . शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या संकल्पनेतून व राष्ट्र प्रथम या ध्येयाची विकसित रूप म्हणून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या मार्गदर्शनाने,तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षक शिफू भारद्वाज व त्यांच्या टीम ने या कार्यशाळेत प्रशिक्षणाद्वारे मार्गदर्शन व सराव करून घेतला आहे. या महिला प्रशिक्षणार्थीना राज्यभरातील शाळांमध्ये अधिकाधिक सक्षमपणे प्रशिक्षण घेता यावे, यासाठी अधिक प्रशिक्षित करण्यात आले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षकांना प्रमाणपत्र देण्यात आले. शासनाच्या महिला सबलीकरण आत्मसंरक्षण व आत्मविश्वास वाढीसाठी हा उपक्रम महत्त्वकांक्षी ठरणार असल्याचा विश्वास शिक्षण विभागाच्यावतीने व्यक्त करण्यात आला.