धाराशिव (प्रतिनिधी)- राज्य सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत अंत्यत सकारात्मक असून, सध्या त्या दिशेने वेगाने काम सुरू आहे. अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील दिली आहे.
बुधवार दि 18 फेब्रुवारी रोजीश्री तुळजाभवानी देवींचे मनोभावे दर्शन चंद्रकांत पाटील यांनी घेतले. यावेळी त्यांनी देवींची आरती करून राज्याच्या प्रगतीसाठी तसेच जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. त्यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. सध्या राज्यभरातील पात्र शेतकऱ्यांची आकडेवारी आणि याद्या गोळा करण्याचे काम युध्द पातळीवर सुरू आहे. कर्जमाफीबाबत सकारात्मक काम चालू असले तरी आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही घोषणा तांत्रिक कारणामुळे शक्य नसल्याचे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले. नियमानुसार अर्थसंकल्पीय अधिवेशनात अशा प्रकाराची घोषणा करण्यास काही तांत्रिक मर्यादा येतात असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी भाजपचे आनंद कंदले, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन चौधर, जनसंपर्क अधिकारी अभिजीत तेरखेडकर, सुरक्षा निरीक्षक ऋषिकेश पाटील, सहायक सुरक्षा निरीक्षक श्रीकांत पवार तसेच मंदिर संस्थानचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
