धाराशिव (प्रतिनिधी)- सन 2025-26 च्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या परिस्थितीची दखल घेऊन शासनाने मनरेगा विभागाकडून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) खालील लाभ देण्याचे जाहीर करण्यात आले आहेत. खरडून गेलेल्या शेतीजमिनींचे पुनर्वसनासाठी प्रति हेक्टर 3 लाख रुपये अनुदान आणि जास्तीत जास्त 2 हेक्टरपर्यंत 5 लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे.खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरींची दुरुस्तीसाठी प्रति विहीर जास्तीत जास्त 30,000 रुपये मदत मंजूर करण्यात आली आहे. या उपाययोजनांमुळे शेतकऱ्यांना शेतीजमिनी व सिंचन साधनांची पूर्वस्थिती पुन्हा उभी करण्यास मदत होणार असून आगामी हंगामात शेती पुन्हा सक्षम होण्यास हातभार लागेल. जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की,आपल्या नुकसानीसंदर्भातील प्रस्ताव संबंधित गटविकास अधिकारी,पंचायत समिती यांचेकडे सादर करावेत.तपासणी व मंजुरीनंतर पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येईल.