धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील धाराशिव, नळदुर्ग, उमरगा, कळंब, या आठही नगर पालिकेत प्राथमिक अंदाजानुसार 65 टक्के मतदान होण्याचा अंदाज आहे. तर तुळजापूर, मुरूम, भूम, परंडा मध्ये 70 टक्के मतदान होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. तुळजापूर येथे मतदानासाठी दुपारी आलेंल्या वयस्कर महिला चक्कर येवून पडली. त्यांना तातडीने उपजिल्हा रूग्णालयात दाखल केल्यानंतर त्या महिलेचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले.
दुपारी साडेतीन पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार धाराशिव नगर परिषदेसाठी 45.53 टक्के, तुळजापूरमध्ये 64.42 टक्के, नळदुर्गमध्ये 56.71 टक्के, उमरग्यामध्ये 54.21 टक्के, मुरूममध्ये 60 टक्के, कळंबमध्ये 55.69 टक्के, भूमध्ये 65.35 टक्के, परंड्यामध्ये 59.11 टक्के मतदान झाले आहे. दुपारी साडेतीनपर्यंत जिल्ह्यात एकूण सरासरी 53.86 टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे प्राथमिक अंदाजानुसार साडेपाच पर्यंत 65 टक्के मतदान होण्याचा अंदाज आहे.
काही मतदान केंद्रावर रांगा
धाराशिव शहरात सायंकाळी पाच नंतर ही खाजा नगर परिसरातील जिल्हा होमगार्ड कार्यालयामध्ये असलेल्या मतदान केंद्रावर महिला व पुरूषांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या होत्या. साडेपाचनंतरही या मतदान केंद्रावर मतदान सुरू राहण्याची शक्यता आहे. सायंकाळी निवडणूक निरीक्षक शिल्पा करमकर यांनी भेट दिली. या मतदान केंद्रासमोर लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्यामुळे पोलिसांनी त्यांना हुसकावून लावले.


