धाराशिव (प्रतिनिधी)- नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. काही ठिकाणी आचारसंहिता भंगाच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. नगर परिषद कार्यालयात नामनिर्देशन अर्जांच्या छाननीदरम्यान परांडा येथे गोंधळ उडाला होता. तसेच दगडफेक देखील झाली होती. त्यामुळे आता आदर्श आचारसंहितेचा भंग करत सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी माजी नगराध्यक्षासह तब्बल 26 जणांवर परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, 18 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी अंदाजे 3 वाजता परंडा नगरपरिषद कार्यालयातील सभागृह व मुख्य प्रवेशद्वाराजवळ नामनिर्देशन छाननी सुरू असताना आरोपींनी एकत्र येऊन गोंधळ निर्माण केला. या गोंधळात नगरपरिषद कार्यालयाच्या मुख्य गेटवर दगडफेक करण्यात आली.या दगडफेकीत शासकीय मालमत्तेचे नुकसान होण्यासोबतच स्वयं आरोपींचे तसेच इतरांच्या जिवीतासही धोका निर्माण झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. घटनास्थळी कायदा-सुव्यवस्थेचे पालन न करता जिल्हाधिकारी धाराशिव यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यामधे जाकीर इस्माईल सौदागर यांच्यासह 26 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी नगरपरिषद कार्यालयातील नगर अभियंता राहुल बंडू रणदिवे यांनी 19 नोव्हेंबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून परंडा पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम 223, 221, 189(2), 191(2), 190, 125, 194(2) सह कलम 135 मोवाका अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून निवडणूक काळातील सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी परिसरात गस्त वाढवली आहे.
