तुळजापूर (प्रतिनिधी)- माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, सोलापूर यांच्या वतीने कोजागरी पौर्णिमानिमित्त तामलवाडी टोल प्लाजा येथे दिनांक 5 ते 6 ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये केंद्र शासनाचे 11 वर्ष सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या विषयांवर दोन दिवसीय डिजिटल मल्टीमीडिया प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती केंद्रीय संचार ब्युरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंबादास यादव यांनी दिली.
सदर प्रदर्शनाचे उद्घाटनासाठी जिल्ह्यातील खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन चोवीस तास सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.
या प्रदर्शनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णायक नेतृत्वाखाली भारताने माघील 11 वर्षात विविध क्षेत्रात केलेली कामगिरी, देशात जलदगतीने होत असलेली विकासकामे आणि धोरणांची माहिती सह विकसित भारताचा अमृत काळामध्ये घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रम विषयीची माहिती या प्रदर्शनामध्ये मांडण्यात आली आहे. सोबत गरीब वंचित, आदिवासी, महिला, युवा, शेतकरी, उद्योजक आणि मध्यमवर्गाच्या विकासासाठी घेण्यात आलेले निर्णय, उज्वला गॅस योजना, डिजिटल इंडिया, पंतप्रधान पीक विमा योजना, किसान सन्मान योजना, आवास योजना, पीएम श्री योजना, मुद्रा योजना, आयुष्मान भारत सारख्या कल्याणकारी योजनांची माहिती, पायाभूत सुविधांमध्ये होत असलेली विकासकामे, देशाची सुरक्षा, परराष्ट्र धोरण आणि ऑपरेशन सिंदूर इत्यादी विषयांची माहिती चित्र, आकडेवारी, मजकूर आणि ऑडीओ-व्हिडीओ च्या माध्यमातून नागरिकांना पाहता येणार आहे.
केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालयाच्या सोलापूर येथील, केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीने व जिल्हा व पोलिस प्रशासन शासनाच्या सहकार्याने तामलवाडी टोल प्लाजा येथे दोन दिवसांकरिता मल्टिमिडीया डिजिटल प्रदर्शन भरविणयात येत आहे. भाविकांसाठी प्रदर्शनातील माहितीवर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा घेऊन विजेत्यांना ताबडतोब बक्षिसे देखील देण्यात येणार आहे तसेच स्थानिक लोक कलावंत यांच्याकडून भारुड, शाहिरी पोवाडा सारख्या प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात येणार आहे.
कोजागिरी पोर्णिमा निमित तुळजाभवानी मातेच्या दर्शनाकरिता पायी चालत येणाऱ्या महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्रप्रदेश राज्यातील भाविकांना केंद्र शासनाने माघील 11 वर्षात घेतलेले निर्णय, धोरणे आणि विविध कल्याणकारी योजनांची माहिती व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असून जास्तीत जास्त भाविकांनी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा. असे आवाहन आयोजकाकडून करण्यात आले आहे.