धाराशिव (प्रतिनिधी)-  धाराशिव शहरातील 140 कोटी च्या रस्ते कामाना कार्यारंभ आदेश आल्यानंतर फडणवीस सरकारने त्यास स्थगिती दिली असून याचा दोष मात्र आमच्यावर? म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असाच प्रकार आता जिल्ह्यात सुरु झाला आहे. निधी जाहीर झाला की त्याच श्रेय यांनीच घ्यायचे पण मनासारखे नाही झाले की आमच्यावर ढकलायचे असा रडका प्रकार राणा पाटील यांनी करत आहेत. असा टोला शिवसेना ठाकरे सेनेचे जिल्हा प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे.

यावेळी जाधवर म्हणाले की, विरोधात असलेल्या आमदार, खासदार यांना या राज्यात सत्ताधारी कशी वागणूक देतात हे कोणालाही वेगळे सांगण्याची गरज नाही. शहरात 140 कोटींचा निधी मंजूर झाला तेव्हा तत्कालीन पालकमंत्री तानाजी सावंत व भाजप आमदार राणा पाटील यांच्यातच श्रेयवाद होता. फेब्रुवारी 2024 पासून कामाची निविदा काढण्यासाठी साधारण 20 महिने लागले. हे राबविताना अनियमितता झाल्याचे त्यांच्याच मित्रपक्षाकडून बोलले जात आहे. जिल्ह्यात हक्काच्या जिल्हा नियोजन समितीच्या कामाना स्थगिती आणली म्हणून ढोल वाजविणारे भाजप आमदार राणा पाटील आता एका कामास त्यांच्याच मित्र पक्षाकडून रस्ते कामास स्थगिती आणल्यावर मात्र विरोधकांना दोष देत आहेत. हे निव्वळ हास्यास्पद आहे. 

रस्त्याची कामे लवकर व्हावी हीच प्रामाणिक भावना आम्ही एसआयटीची मागणी केलीच आहे. त्यात दोष कोणाचा हे समोर येईल. पण तुमच्या अर्थकारणामुळे शहरवासीयांचे वीस महिन्यापासून जे हाल होत आहेत हे थांबावेत. ही रस्त्याची कामे लवकर सुरु व्हावेत हीच आमची प्रामाणिक भावना असल्याचे जाधवर यांनी सांगितले.

 
Top