तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी माता मंदिराची कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सजावट करण्याचा मान यंदाही सलग दहाव्या वर्षी पुण्यातील आर आर किराड उद्योग समूह भूषवत आहे. गेल्या दशकभरापासून सातत्याने ही सेवा पार पाडत मंदिराच्या आराधनेशी सजावटीचे एक आगळेवेगळे नाते समूहाने जपले आहे.
यंदाची आरास विशेष ठरत आहे कारण प्रथमच फुलांसोबत देवीला अर्पण होणारे पारंपरिक दागिने आणि पूजावस्तू यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये कवडीच्या माळा, नथ, बांगड्या, कुंकू (सिन्दूर), खण-चोळी,नारळ, जोडवी आणि अन्य पूजात्मक अलंकारांच्या सहाय्याने देवीचा दरबार अधिक पारंपरिक आणि भव्यतेने सजला आहे. फुलांच्या सुवासासह या पारंपरिक दागिन्यांची जोड मिळाल्याने गाभारा, मुख्य मंडप आणि प्रवेशद्वार परिसर भक्तिमय आणि दैवी प्रकाशाने उजळून निघत आहे.
यंदाच्या आरासेला दिलेला भावार्थ:
“जगत्त्वं जगदाश्रया महादेवीश्वरूपिणी”महाराष्ट्रातील अलीकडील पूरस्थिती आणि निसर्गजन्य संकटांच्या पार्श्वभूमीवर देवीपाशी शांती, संरक्षण आणि पुनर्बांधणीची प्रार्थना या संदेशातून करण्यात आली आहे. या सेवेबद्दल बोलताना आर. आर. किराड समूहाचे व्यवस्थापकीय संचालक नरेश किराड यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. “तुळजाभवानीच्या दर्शनात आम्हाला ऊर्जा, आशीर्वाद आणि मार्गदर्शन मिळते. सलग दहाव्या वर्षी सजावट करण्याची संधी मिळणे, ही आमच्यासाठी परम सन्मानाची बाब आहे. यंदा पूरग्रस्त महाराष्ट्राच्या कल्याणासाठी आणि सर्वांच्या संरक्षणासाठी ही सेवा आम्ही समर्पित करीत आहोत.”
भाविकांकडून या सजावटीचे मोठ्या उत्साहाने स्वागत होत असून “आर आर किराड समूहाची ही सेवा म्हणजे पुणेकरांचा सन्मान आणि तुळजापूरची परंपरा” अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.देवीच्या चरणी समर्पित ही आरास श्रद्धा, सेवा आणि आशेचा संदेश देत आहे.