धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील रस्त्यांचा रखडलेला प्रश्न आता निकाली निघाला आहे. निविदेतील 2023-24 च्या अंदाजपत्रकीय दरानेच ही सगळी कामे होणार आहेत. त्यामुळे आजच्या दराची तुलना केली असता सरकारचे अर्थात जनतेचे जवळपास साठ कोटी रुपये वाचणार आहेत. तुळजापूर आणि नळदुर्गबरोबरच हे काम सुरू झाले असते तर, कदाचित आत्तापर्यंत सत्तर टक्के काम पूर्णही झाले असते. आता कार्यारंभ आदेश झाले आहेत. लवकरच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते धाराशिव शहरातील 140 कोटी रूपयांच्या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
प्रतिष्ठान भवन येथे या अनुषंगाने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शहरातील रस्त्यांच्या कामाचा प्रश्न आता निकाली निघाला असून लवकरच कामास सुरुवात होणार असल्याचे स्पष्ट केले. या कामांसाठी एकूण 18 महिन्यांची कालमर्यादा असली तरीही कालमर्यादेच्या आत ही सगळे रस्ते अगदी दर्जेदाररित्या पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी नमूद केले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पाठपुराव्याला मोठे बळ दिले आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांच्या कामाला आता प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कामाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. आपण स्वतः मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊन धाराशिव येथील भूमिपूजन कार्यक्रमाचे निमंत्रण दिले आहे. तिन्ही मान्यवरांनी अनुमती दिलेली आहे. तारीख निश्चित झाल्यावर तातडीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहितीही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
यावेळी या पत्रकार परिषदेस भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, नितीन काळे, अमित शिंदे, नेताजी पाटील आदी उपस्थित होते.
