तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवात रविवार, दि. 28 सप्टेंबर रोजी सातव्या माळेच्या दिवशी शेषशाही अलंकार महापूजा विधीवत पार पडली. सकाळपासून मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
या दिवशीच्या अलंकार पूजेचे धार्मिक व पौराणिक महत्त्व मोठे मानले जाते. आख्यायिकेनुसार भगवान विष्णू क्षीरसागरात शेषशैयावर विश्राम घेत असताना त्यांच्या नेत्रकमलात देवी विश्राम घेत होती. त्यावेळी विष्णूंच्या कानातील मलापासून शुंभ व निशुंभ हे दैत्य उत्पन्न झाले आणि त्यांनी विष्णूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ब्रह्मदेवांनी देवीची स्तुती करून तिला जागविले. देवीने प्रकट होऊन त्या दैतांचा संहार केला आणि विष्णूंचे रक्षण केले. त्यानंतर भगवान विष्णूंनी आपली शेषशैया देवीला अर्पण केली. म्हणून शेषशाही अलंकार महापूजा मांडली जाते.
नवरात्र महोत्सवात दररोज सकाळ-संध्याकाळ विविध धार्मिक विधी आणि पूजाअर्चा पार पाडल्या जात आहेत. भाविकांच्या गर्दीमुळे मंदिर परिसरात भक्तिमय आणि उत्सवी वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान शनिवारी दि. 27 सप्टेंबर रोजी रात्री श्री देवीजींची गरुड वाहनावरून छबिना मिरवणूक पार पडली. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.