नळदुर्ग (प्रतिनिधी)-नळदुर्ग ता. तुळजापूर येथे रविवार (ता.31) रोजी शहर सकल मराठा समाज यांच्या वतीने मुंबई येथे मराठा आरक्षण आंदोलनासाठी मुंबईत जमलेल्या मराठा बांधवांना रसद म्हणून पाच पोते कडक भाकरी, तीन हजार भाकरी, वीस किलो शेंगा चटणी, पाच किलो ठेचा, चार किलो लोणचे व वीस बॉक्स पाणी बॉटल व इतर खाद्यपदार्थ घराघरातून जमा करण्यात आले व मुंबईकडे रविवारी रात्री दहा जण रवाना झाले. शहरातील काही मुस्लिम बांधवांनीही मदतीसाठी हातभार लावला. 

नळदुर्ग शहरातील सकल मराठा समाजाच्या वतीने घराघरातून भाकरी चटणी व इतर खाद्यपदार्थ पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणे शहरातील मराठा गल्ली, माऊली नगर, व्यास नगर व इतर भागातून मोठ्या प्रमाणात शिबंदी बनवण्यात आली.  रतिकांत नागणे, एकनाथ कदम, बबन चौधरी, गणेश शिंदे, राहुल बेले, आशिष जगदाळे, विशाल मोटे, संतोष साळुंखे, अजिंक्य पवार, पवन बाबर हे सर्वजण रसद घेऊन मुंबईला रवाना झाले. पत्रकार तानाजी जाधव, भगवंत सुरवसे, स्वप्निल काळे, शिवराम नागणे, वैभव पाटील, उमेश जाधव, संजय जाधव, शिवाजी सुरवसे, धनाजी जाधव, युवराज जगताप, आकाश काळे, प्रशांत पवार, उमेश मुळे यांच्यासह सकल मराठा समाजातील नागरिकांनी याकामी परिश्रम घेतले.

 
Top