तुळजापूर (प्रतिनिधी)- मुसळधार पावसाने तुळजापूर तालुक्यातील बोळेगाव, कुणसावळी व परिसरातील गावांमध्ये प्रचंड नुकसान केले आहे. अनेक कुटुंबांची घरे उद्ध्वस्त झाली असून काहींच्या घरात पाणी शिरल्याने ग्रामस्थांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.
या आपत्तीच्या काळात शिवसेना तालुकाप्रमुख अमोल जाधव यांनी पुढाकार घेत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी हात पुढे केला. “अनाथाचा नाथ एकनाथ” या घोषवाक्याला अनुसरून पीडित कुटुंबांना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. या मदतीमुळे पीडितांना तात्पुरता दिलासा मिळाला असून ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर समाधान झळकले.
गावांची पाहणी करताना जाधव म्हणाले “शिवसेना सदैव जनतेच्या सोबत आहे. प्रत्येक संकटात, प्रत्येक दुःखात आम्ही लोकांसोबत खंबीरपणे उभे आहोत. प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत द्यावी,” अशी मागणी त्यांनी केली. जाधव यांनी परिस्थितीची माहिती पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना देऊन तातडीने मदत मिळेल, याची ग्वाही दिली आहे. मदतकार्यावेळी युवा नेते शहाजी हाके, गणेश नेपते, स्वप्निल सुरवसे, पांडुरंग शिंदे, अंकुश रूपनर, राहुल शिंदे यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते. सध्या पावसाचा तडाखा बसलेल्या गावांमध्ये भीतीचे वातावरण असून ग्रामस्थांना प्रशासनाकडून तातडीच्या मदतीची अपेक्षा आहे.