धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील बऱ्याच भागात शनिवार दिनांक 13 सप्टेंबर रोजी सायंकाळी मुसळधार पावसाने हाहाकार माजवला. अवघ्या चार तासांत तब्बल 152 मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसाने शेतीपीकांसह नदीकाठच्या घरादारांचे मोठे नुकसान झाले आहे. धाराशिव तालुक्यातील ढग©फुटी सदृश्य पाऊस पडल्यामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचा त्वरीत पंचनामा करावा अशी मागणी करण्यात येत आहे.
शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अचानक कोसळलेल्या या पावसामुळे अनेक ठिकाणी ग्रामीण भागाचा संपर्क तुटला होता. हा पाऊस मुख्यत्वे तडवळा, ढोकी, तेर, खेड, खामगाव, जागजी, ढोराळा, रुई, गोवर्धनवाडी या भागात नुकसानकारक ठरला. दरम्यान गोवर्धनवाडी परिसरात पडलेल्या पावसाची नोंद 152 मिमी इतकी आहे.
ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याचे बोलले जात आहे. या पावसामुळे धाराशिव ते लातूर हा राज्यमार्ग रुई ढोकी येथे बंद झाला होता. रुई येथील पुलावर जवळपास चार फूट पाणी साचल्यामुळे रात्री दहा वाजता हा मार्ग वाहतुकीस बंद करण्यात आला होता. रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास रुई ढोकी येथील पुलावरून एक चारचाकी गाडी तेरणा नदीत वाहून जात होती. मात्र तिथे उपस्थित काही तरुणांनी शर्थीचे प्रयत्न करून गाडी पाण्याबाहेर काढली. सध्या हा मार्ग वाहतुकीस पुन्हा एकदा सुरू झाला आहे. अनेक भागात मुख्य रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. नदीकाठच्या भागातील व सखल भागात अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते.
आमदारांचे आवाहन
दरम्यान, प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून नाल्यांजवळ व नदीकाठच्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. आमदार कैलास पाटील आणि आमदार राणा पाटील यांनीही नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. काही दुर्घटना घडल्यास तात्काळ कळविण्याचे देखील दोन्ही आमदारांनी आवाहन केले आहे. हवामान विभागाने आज देखील मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पावसामुळे शेतीपिकांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हाताशी आलेले नगदी पीक सोयाबीन पाण्यात गेल्यामुळे शेतकरी परत एकदा आर्थिक संकटात सापडला आहे. शासकीय यंत्रणेकडून तात्काळ पंचनामे करून मदतीची मागणी शेतकरी करत आहेत.