धाराशिव (प्रतिनिधी)- पत्रकारांवर होणाऱ्या अन्याय, दडपशाही व खोट्या कारवाईच्या धमक्या दिल्या जात आहेत. तर तुळजापूर येथील ड्रग प्रकरण आदींसह विविध मुद्द्याबाबत पत्रकारांनी वास्तव मांडल्यामुळे पत्रकारांना टार्गेट करीत बघून घेईन, आमच्या कार्यकर्त्यांचा संयम सुटल्यानंतर पत्रकारांचे काय होईल ? यासह इतर प्रकारच्या धमक्या देण्याचे प्रकार हल्ली वाढलेले आहेत. त्यामुळे पत्रकारांना धमकावणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे पत्रकारांच्या शिष्टमंडळाने एका निवेदनाद्वारे दि.25 ऑगस्ट रोजी केली आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, मागील अनेक वर्षांपासून समाजातील घडामोडी, जनहिताचे प्रश्न आणि शासनाच्या योजनांची माहिती प्रामाणिकपणे जनतेपर्यंत आम्ही पोहोचवत आहे. परंतु अलीकडील काळात आमच्यावर अन्याय, दडपशाही व खोट्या आरोपांचा प्रयत्न करण्यात येत आहे.
काही दिवसापूर्वी अवैध धंदे सरसकट का बंद केले जात नाहीत ? याबाबत एका दैनिकाचे पत्रकार चंद्रमणी गायकवाड यांनी स्थानिक पोलिसांना प्रश्न विचारला. त्यावेळी तुम्ही शासकीय कामात अडथळा निर्माण करता का ? असे म्हणत एनसी दाखल करून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. विशेष म्हणजे त्यांना एफआयआर प्रत देण्यास नकार देण्यात आला. तसेच धाराशिव लाईव्हचे संपादक सुनील ढेपे यांनाही तुळजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरक्षक यांच्याकडून धमकावण्यात आले. तर तुळजापूर येथील एका नेत्याने व त्यांच्या कार्यकर्त्यांनी थेट पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच ढेपे यांना बघून घेऊ म्हणत पोलीस तक्रार करण्यात आली आहे. पत्रकारांच्या विरोधात होत असलेल्या अन्यायाविरोधात पत्रकार संरक्षण कायदा यांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी हुंकार बनसोडे, राजाभाऊ वैद्य, संतोष जाधव, बालाजी निरफळ, रहीम शेख, चंद्रसेन देशमुख, सयाजी शेळके, महेश पोतदार, शीला उंबरे, आकाश नरोटे, जुबेर शेख, किरण कांबळे, आतिक सय्यद, युसुफ मुल्ला, वैभव पारवे, सुभाष कदम, किशोर माळी, आयुब शेख, मुस्तफा पठाण, प्रमोद राऊत, कलीम शेख, पांडुरंग मते, मल्लिकार्जुन सोनवणे, अमजद सय्यद, गणेश जाधव, संतोष शेटे, कुंदन शिंदे, राकेश कुलकर्णी, विशाल जगदाळे, जब्बार शेख, कलीम सय्यद, सुरेश चव्हाण आदी पत्रकारांच्या सह्या आहेत.