धाराशिव (प्रतिनिधी)- कृत्रिम फुलांमुळे जरबेरा उत्पादक शेतकरी देशोधडीला लागला असून अश्या कृत्रिम फुलावर बंदी घालावी. अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी सभागृहात केली. ते प्रश्नोत्तर काळादरम्यान या मुद्द्यावर बोलत होते.
यावेळी आमदार पाटील म्हणाले, महाराष्ट्रातील हजारो शेतकरी आपल्या शेतीमध्ये आधुनिक पद्धतींचा अवलंब करत पॉलिहाऊस व शेडनेटमध्ये जरबेरा व इतर फुलांचे उत्पादन घेत आहेत. यासाठी शेतकरी सरकारी योजनांच्या माध्यमातून, तसेच खासगी बँकांमधून लाखो रुपयांचे कर्ज घेतात. परंतु, सध्या बाजारात मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या कृत्रिम फुलांमुळे नैसर्गिक फुलांची मागणी घटली आहे. त्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक ताण निर्माण झाला आहे. त्याविषयी आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेत हा प्रश्न उपस्थित केला.
आमदार कैलास पाटील पुढे म्हणाले, “कृत्रिम फुलांमुळे नैसर्गिक फुलांच्या शेतीत नुकसान होत आहे. बाजारपेठ कोसळत आहे. शेतकरी आर्थिकदृष्ट्या कमकुवत होत आहेत. जर हे धोरणात्मक आहे तरी हे सभागृहच धोरण ठरवण्याचे ठिकाण आहे. त्यामुळे आता वेळ आली आहे. अन्यथा शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर पोहोचतील.”
राज्यभरातील हजारो शेतकऱ्यांची आणि इतर लोकप्रतिनिधींचीही हीच मागणी आहे. मग जर सर्वांचे यावर एकमत असेल तर कृत्रिम फुलांवर बंदी घालण्यात अडचण काय आहे?” असा सवाल आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेत उपस्थित केला. आमदार पाटील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर राज्याचे फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी सकारात्मक निर्णय घेऊन पर्यावरण मंत्री यांच्यासोबत अधिवेशन संपण्याअगोदर बैठक आयोजित करु. या बैठकीत योग्य निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे आश्वासन मंत्री गोगावले यांनी उत्तरादरम्यान दिले.