धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यामध्ये वृक्षांचे प्रमाण वाढावे, जिल्हा वृक्षांनी आच्छादित व्हावा व त्या माध्यमातून पर्यावरणाचा समतोल राखता यावा. यासाठी वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. येत्या 19 जुलै रोजी जिल्ह्यातील 294 ठिकाणच्या 5 हजार 702 आर क्षेत्रावर 15 लक्ष विविध देशी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यामध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग राहणार असून, प्रत्येकांनी ते झाड आपले आहे या भावनेने कुटुंबासह येऊन सहभागी होत वृक्षारोपण करावे असे आवाहन जिल्हाधिकारी किर्ती कुमार पुजार यांनी केले आहे.
रोपण केलेल्या वृक्षासोबत आपल्या आईसह कुटुंबासमवेत सेल्फी काढणे आवश्यक आहे. लावलेले वृक्ष ही सरकारी मोहीम न समजता स्वतःच आपल्या व भावी पिढीच्या फायद्यासाठी त्याची कशी जपवणूक होईल याची काळजी घ्यावी.त्यासाठी हरित धाराशिव महोत्सव म्हणजेच वृक्ष लागवड हा सृष्टीचा सोहळा साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हा प्रशासन आणि उत्स्फूर्त लोकसहभागातून हरित धाराशिव अभियान,एक पेड मॉ के नाम, संकल्प वृक्षरोपणाचा... एका दिवसात 15 लक्ष वृक्षांचा या अंतर्गत हरित धाराशिव अभियान संदर्भात आढावा बैठकीचे आज आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी जिल्हाधिकारी पुजार बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मैनाक घोष,उपजिल्हाधिकारी (रोहयो) प्रवीण धरमकर,विभागीय वन अधिकारी बी.एस.पोळ,सामाजिक वनीकरणचे विभागीय वन अधिकारी व्ही.के.करे,उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
पालकमंत्र्यासंह खासदार, आमदार सहभागी होणार
पुढे बोलताना जिल्हाधिकारी पुजार म्हणाले की,पालकमंत्री, खासदार, आमदार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, पंचायत समितीचे सभापती, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते व त्यांच्या उपस्थितीत वृक्ष लागवड करावी. असे आवाहन त्यांनी केले.
वृक्षांना क्यु आर कोड
वृक्षांना क्यु आर कोड बसविण्यात येणार असून ही वृक्ष लागवड सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये सर्वांना दिसणार आहे. 10 आर क्षेत्रासाठी 10 वृक्ष मित्र आवश्यक असून क्षेत्राप्रमाणे त्याची संख्या वाढणार असल्याचे पुजार यांनी सांगितले.