कळंब (प्रतिनिधी)- अक्कलकोट (जि. सोलापूर) येथे दिनांक 13 जुलै 2025 रोजी संभाजी ब्रिगेडचे राज्यस्तरीय नेते प्रवीण गायकवाड यांच्यावर काही समाजकंटकांनी शाही फेकून आणि अन्य हिंसक प्रकारांनी जीवघेणा हल्ला केला. या घटनेच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज कळंब येथील तहसीलदार कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात स्पष्ट करण्यात आले की हा हल्ला केवळ एका व्यक्तीवर नाही, तर संपूर्ण पुरोगामी विचारसरणी, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाही मूल्यांवर झालेला घातक आघात आहे. त्यामुळे हल्लेखोरांविरुद्ध भारतीय दंड विधान (IPC) आणि आतंकवादविरोधी कायदा (UAPA) अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली. तसेच प्रवीण गायकवाड यांना शासनस्तरावर तातडीने सुरक्षा पुरवण्यात यावी आणि अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी राज्यस्तरावर स्वतंत्र तपास यंत्रणा स्थापन करून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात याव्यात, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
या निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक अतुल गायकवाड, जिल्हाध्यक्ष ऍड. तानाजी चौधरी, ऍड.अशोक चोंदे, महेश कोळंपे, आश्रुबा चोंदे, चेतन कात्रे, अक्षय मुळीक, विलास गुंडा, मुकुंद शेळके, शरद जाधव, अनिल गायकवाड, भैय्या पवार, शरद शेळके, सुंदर लोमट, इम्रान मिर्झा, ज्योतीताई सपाटे, कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वाक्षऱ्या करून आपला तीव्र निषेध नोंदवला.