धाराशिव (प्रतिनिधी)-  जिल्हयात वनक्षेत्र अत्यंत कमी आहे. जिल्हयात पर्यावरणाच्या दृष्टीने वनाच्छादित क्षेत्र वाढविणे गरजेचे आहे. या पावसाळयात जिल्हयात 50 लक्ष वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.तर 19 जुलै रोजी जिल्हा प्रशासन उत्स्फूर्त लोकसहभागातून 15 लक्ष वृक्ष लागवड करणार आहे. आपल्याला केवळ वृक्ष लागवडच करून चालणार नाही तर लावलेल्या प्रत्येक वृक्षाचे संगोपन करून त्याला वाढविणे अत्यंत महत्वाचे आहे.असे मत जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी व्यक्त केले.

दि. 30 जुन रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परीसरातील जिल्हा नियेाजन समिती सभागृहात आयोजित वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाच्या आढावा बैठकीत श्री.पुजार बोलत होते.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर, विभागीय वनअधिकारी बी.के.पोळ, सामाजिक वनीकरणाचे विभागीय वन अधिकारी व्ही.के.करे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) श्याम गोडभरले, जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे,उपजिल्हाधिकारी अरूणा गायकवाड,उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख,वैशाली पाटील व संजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ.घोष म्हणाले की, ग्रामीण भागात वृक्ष लागवडीसाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घ्यावा.ज्या ग्रामपंचायती घनवन वृक्षलागवड करणार आहे.त्या ग्रामपंचायतींनी ग्रामस्थांना विश्वासात घेवून वृक्षलागवडीसोबत वृक्ष संगोपनाची जबाबदारी स्विकारावी. धरमकर म्हणाले की,50 लक्ष वृक्ष लागवडीत नागरीकांचा उत्स्फुर्त लोकसहभाग असला पाहिजे. यावेळी उपस्थित नोडल अधिकाऱ्यांनी त्यांना नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रात वृक्ष लागवडीसाठी केलेल्या तयारीची माहिती दिली. तसेच 10 नगर पालीकांच्या मुख्याधिकारी यांनी त्यांच्या शहरी क्षेत्रात 19 जुलै रोजी व या पावसाळयात करण्यात येणाऱ्या वृक्षलागवडीची माहिती दिली. तहसिलदार, गट विकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांनी देखील वृक्ष लागवडीच्या तयारीची माहिती यावेळी दिली. सभेला विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, नगर पालिकांचे मुख्याधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी तसेच संबंधित विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

 
Top