उमरगा (प्रतिनिधी)- शेतकरी, दिव्यांग, शेतमजूर, कामगार, दुग्धव्यवसायीक, मेंढपाळ, विधवा व निराधारांच्या विविध मागण्यासाठी माजी आमदार बच्चुभाऊ कडू हे अन्नत्याग करत आहेत. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने उमरगा शहरात रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार डॉ.अमित भारती यांना निवेदन देण्यात आले.

दिव्यांग व विधवा महिलांना दरमहा 6 हजार रुपये मानधन देण्यात यावे. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी देण्यात यावी, युवकांच्या हाताला काम द्यावे नाहीतर सन्मानजनक दाम देण्यात यावा, रिक्त जागा तातडीने भरण्यात याव्यात, शहर व ग्रामिण भागातील घरकुलांसाठी 5 लाख अनुदान देण्यात यावे, शेतकऱ्यांप्रमाणे शेतमजूरांना अपघाती मृत्यु झाल्यास आर्थीक सहाय्य देण्यात यावी व शेतमजूरांकरीता स्वतंत्र मंडळ स्थापन करण्यात यावे. मनरेगाची मजूरी 312 वरून 500 रुपये करावी, मेंढपाळ व मच्छीमार यांच्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करून त्यांचे प्रश्न मार्गी लावावे आदीसह विविध मागण्यासाठी माजी आमदार बच्चू कडू अन्नत्याग आंदोलन करत आहेत. सरकारकडून सकारात्मक चर्चा होत नाही. बच्चु कडू यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी उमरगा तालुका येथे स्व. बाळासाहेब ठाकरे चौकात प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदारमार्फत निवेदन देण्यात आले. या आंदोलनात आमदार प्रवीण स्वामी, प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष ईसाक शेख, वंचित बहुजन आघाडीचे रामभाऊ गायकवाड, अखिल भारतीय छावा संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष बाळासाहेब माने, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष अण्णासाहेब पवार, रामेश्वर मदने, नागराज मसरे ,राहुल मन्नाडे, नारायण भोसले आदीसह शेतकरी, दिव्यांग बाधव, कामगर मोठ्या संख्येने उपस्थित होते. नायब तहसीलदार डॉ. अमित भारती यांनी आंदोलनस्थळी येऊन निवेदन स्विकारले. यावेळी पोलिस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी तगडा पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

 
Top