उमरगा (प्रतिनिधी)- केंद्र शासनाच्या नविन धोरणानुसार ई-नाम राष्ट्रीय कृषि बाजार या नविन प्रणालीमुळे शेतकरी बांधवांचा आर्थिक फायदा होणार असुन व्यवहारातील पारदर्शकता वाढणार असल्याचे प्रतिपादन भारत सरकार कृषि मंत्रालयाचे नियुक्त मार्गदर्शक रंगनाथ कटरे यांनी केले.
केंद्र शासानाचे राष्ट्रीय कृषि बाजार ई-नाम योजनेमध्ये उमरगा कृषि उत्पन्न बाजार समितीची निवड झाल्यामुळे त्या अनुषंगाने बाजार समितीतील परवानाधारक आडते, व्यापारी व अधिकारी, कर्मचारी तसेच कार्यक्षेत्रातील शेतकरी यांचेसाठी उमरगा कृषि उत्पन्न बाजार समिती सभागृहात बुधवार (दि.11) केंद्र शासनाच्या नविन धोरणानुसार ई-नाम (राष्ट्रीय कृषि बाजार) योजने बाबत संबंधीत माहिती देण्यासाठी मार्गदर्शपर प्रशिक्षणवेळी रंगनाथ कटरे बोलत होते. प्रारंभी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पुढे बोलताना श्री करे म्हणाले की, शेतीमालास योग्य भाव, शेतीमालाचे वर्गीकरण (ग्रेडींग), योग्य हाताने व मालाचे योग्य वजन व विक्री झालेल्या मालाचे या योजने अंतर्गत राज्यातील इतर बाजार समितीमध्ये नोंद असणाऱ्या खरेदीदारांना, व्यापाऱ्यांना बोली लावणे शक्य होणार आहे. त्यामुळे स्पर्धा निर्माण होऊन चांगला दर मिळवता येणार आहे. यामुळे भविष्यात गावातील शेतीमालास राष्ट्रीय स्तरावरही बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार असुन शेतकऱ्यांना देय असणाऱ्या रक्कमांबाबत अधिक सुरक्षितता निर्माण होणार आहे. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकरी बांधवांनी ई-नाम साठी उमरगा बाजार समितीकडे नोंद करणे गरजेचे आहे. नोंदणीसाठी आधारकार्ड, बँक पासबुक, झेरॉक्स व मोबाईल नंबर अनिवार्य आहे तसेच आपल्या मोबाईलव्दारे गुगल प्ले स्टोअर मधुन ई-नाम ॲप डाउनलोड करुन पण स्वतः आपली नोंदणी करु शकता असे आवाहन रंगनाथ कटरे यांनी केले. यावेळी समितीचे सचिव सिध्दप्पा घोडके म्हणाले की, केंद्र शासनाच्या ई-नाम योजनेचा शेतकरी व व्यापारी बांधवांना फायदा होणार आहे ई-नाम अंतर्गत बाजार आवारात होणाऱ्या शेतीमालाच्या लिलावाची प्रक्रिया सर्वप्रथम ई-नाम प्रक्रियेद्वारे राबविणार आहे. यासाठी बाजार समितीच्या एकुण 26 व्यापाऱ्यांना
ई-नाम योजनेमध्ये समाविष्ठ केले असुन ई-नाम मध्ये एकुण 1132 शेतकऱ्यांची नोंदणी केल्याचे घोडके यांनी स्पष्ट केले. यावेळी कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती बसवराज कस्तुरे, उपसभापती विजयकुमार माने, संचालक प्रल्हाद काळे, सुभाष गायकवाड, मारुती पाटील, राजेंद्र तळीखेडे, विक्रम इंगळे, बालाजी महावरकर, गुंजोटी वि.का. सोसायटीचे सचिव बालाजी पोतदार, संचालक किसन पाटील, अण्णाराव सुर्यवंशी, व्यापारी धनराज हिरमुखे, सुभाष गिरीबा, प्रकाश सुर्यवंशी, बाजार समितीचे सचिव सिध्दप्पा घोडके आदीसह कर्मचारी व शेतकरी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.