धाराशिव (प्रतिनिधी)- महावितरणच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त ‘शुन्य अपघात महावितरण, शुन्य अपघात महाराष्ट्र’ ही संकल्पना घेऊन राज्यभरात १ ते ६ जून दरम्यान वीज सुरक्षा सप्ताह साजरा होत आहे. सप्ताहाच्या दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी (०२ व ३ जून) धाराशिव मंडलातील सर्वच उपविभागांमध्ये विविध ठिकाणी वीज सुरक्षेचा जागर करण्यात आला.
‘आम्ही सुरक्षेचे शिल्पकार, शुन्य अपघाताने करू महावितरणचे ध्येय साकार’ हे ब्रिद घेऊन वीज सुरक्षेबाबत जनजागृती करत निघालेल्या कर्मचारी-अधिकाऱ्याच्या मॅरेथॉनने १ जुनला लातूर परिमंडलात विद्युत सुरक्षा सप्ताहाचा शुभारंभ झाला. तर सोमवारी उपविभागीय स्तरावर वीज ग्राहकांपर्यंत पोहचत विजेचा वापर करताना घ्यावयाच्या खबरदारीबाबत प्रबोधन करण्यात आले. तूळजापूर शहर, धाराशिव शहर तसेच तेर, माळूंब्रा, मंगरूळ, नळदुर्ग, उमरगा, कळंब, वाशी आदी ठिकाणी वीज सुरक्षेबाबत प्रबोधन केले तसेच लोहारा व उमरगा येथे बाह्यस्त्रोत कामगारांना सेफ्टीटुलचे वाटप करण्यात आले.
गुरूवार दि.५ जुनला वसुंधरा दिनी तूळजापूर व धाराशिव विभागीय स्तरावर वीज सुरक्षा व बचत विषयी रॅली काढण्यात येणार असून वृषारोपन ही केले जाणार आहे. तर ६ जून रोजी सकाळी परिमंडलातील सर्व शाखा कार्यालयातील जनमित्र वीज सुरक्षेबाबत प्रतिज्ञा घेणार आहेत. याच दिवशी महावितरणचा २० वा वर्धापन दिन सर्व कार्यालयांमध्ये उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.