धाराशिव (प्रतिनिधी)- भारतीय जनता पक्षाच्या धाराशिव जिल्ह्यातील विविध मंडळांसाठी नवनियुक्त अध्यक्षांची यादी नुकतीच जाहीर झाली आहे. ही यादी पक्षाच्या संघटनात्मक ताकदीला बळकटी देणारी आणि तळागाळातील कार्यकर्त्यांच्या सातत्यपूर्ण योगदानाचा सन्मान करणारी आहे. विशेषतः लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये विस्तारक म्हणून भूमिका बजावलेल्या कार्यकर्त्यांना यंदा दिलेली संधी ही पक्षाच्या कार्यसंस्कृतीचा एक महत्त्वाचा टप्पा मानली जात आहे.
कळंब शहर मंडळासाठी मकरंद पाटील आणि उमरगा ग्रामीण मंडळासाठी सिद्धेश्वर माने यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. या दोघांनीही विधानसभा व लोकसभा निवडणुकांदरम्यान विस्तारक म्हणून झपाटून कार्य केले होते. संघटन, नियोजन व जनसंपर्काच्या दृष्टीने यशस्वी योगदान देणाऱ्या या कार्यकर्त्यांना दिलेली जबाबदारी ही पक्षाने त्यांच्या कार्यक्षमतेवर ठेवलेला विश्वास स्पष्ट होतो आहे.
त्याचबरोबर, सभापती म्हणून प्रशासकीय अनुभव असलेले दत्ता साळुंके यांची कळंब ग्रामीण पश्चिम मंडळाच्या अध्यक्षपदी, तर साखर कारखान्याच्या माध्यमातून ग्रामीण जनतेमध्ये प्रभाव पाडणारे अरुण चौधरी यांची कळंब ग्रामीण पूर्व मंडळासाठी निवड झाली आहे.
याबरोबरच, मुरूम मंडळासाठी निरजानंद अंबर, धाराशिव ग्रामीण पूर्व मंडळासाठी नीलकंठ पाटील, धाराशिव ग्रामीण पश्चिम मंडळासाठी अनिल भुतेकर, आणि वाशी मंडळासाठी राजगुरु कुकडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीतून भाजपने केवळ अनुभव आणि क्षमता या निकषांवर नव्हे, तर बूथ पातळीवरील प्रत्यक्ष कार्यकर्त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे.
“या नियुक्त्या म्हणजे संघटनेत सातत्याने कार्य करणाऱ्या आणि जमिनीवर मेहनत घेणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान आहे. नव्या जबाबदाऱ्यांमुळे संघटनेला अधिक बळ मिळेल.अशी प्रतिक्रिया भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी दिली. यामुळे धाराशिव जिल्ह्यातील पक्ष संघटनेत नवचैतन्य निर्माण होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी देण्याच्या भाजपच्या धोरणामुळे पक्षाची संघटनात्मक ताकद आणखी वाढेल, अशी अपेक्षा असल्याचे सांगितले.