धाराशिव (प्रतिनिधी) - धाराशिव शहरातील शाळकरी बहिणीची छेड काढणाऱ्या नराधम टोळक्यांना जाब विचारणाऱ्या भावाचा आरोपींनी संगणमताने ठेचून निर्घृणपणे खून केली. ही अत्यंत गंभीर घटना असताना देखील पोलिसांनी तपासात अक्षम्य दिरंगाई करीत मुख्य आरोपीसह सर्व आरोपींना अद्यापही अटक केलेली नाही. त्यामुळे त्या सर्व आरोपींना अटक करून फसावर लटकावावे. तसेच धाराशिव शहर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी यासह इतर विविध मागण्यांसाठी, या गंभीर बाबीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर वडार एकता परिषदेच्यावतीने दि.13 जून रोजी टाहो फोडीत आक्रोश करीत धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व वडार एकता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय अध्यक्ष भरत विटकर यांनी केले. 

धाराशिव शहरातील वडार समाजातील विद्यार्थिनी दि.8 मे रोजी रस्त्याने जात असताना धाराशिव शहरातील टवाळखोर गुंडांनी तिची छेडछाड काढली. त्यामुळे तिचा भाऊ मारुती शिवाजी इटलकर याने संबंधितांना जाब विचारला. त्याचा राग मनात धरून रणजीत चौधरी याच्या सांगण्यावरून सागर चौधरी, प्रवीण चौधरी, किशोर चौधरी, अंकुश चौधरी व सिद्धनाथ सावंत यांनी संगणमत करून मारुती इटलकर यास अमानुष बेदम मारहाण केली. त्यांनी केलेल्या मारहाणीत मारुती जबर जखमी झाला. त्यास उपचारासाठी दवाखान्यात नेले असता उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी वरील आरोपी विरोधात तक्रार दिली असताना देखील धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी संबंधित सर्व आरोपींना अटक केलेली नाही. त्यांनी मुख्य आरोपीसह इतर आरोपींना अभय देण्याचे काम केले आहे. त्यामुळे इटलकर कुटुंबाला न्याय देण्यासाठी त्या कुटुंबाचे संपूर्ण पुनर्वसन सरकारने करावे. त्या कुटुंबातील मुलीच्या पुढील शिक्षणाची व नोकरीची जबाबदारी सरकारने घ्यावी. त्या कुटुंबाला 25 लाख रुपये तातडीची आर्थिक मदत करावी. त्या कुटुंबाला रहायला हक्काचे सरकारी घर देण्यात यावे. तसेच धाराशिव शहर पोलीस ठाण्याच्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी तपासात हलगर्जीपणा केला आहे. त्यामुळे तपासात हलगर्जीपणा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आदी मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास तुळजापूर नाका येथून निघून खाँव्जा नगर, देशपांडे स्टॅन्ड, ताजमहल टॉकीज, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक, जिल्हा न्यायालय मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास धडकला. यावेळी मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उभारण्यात आलेल्या स्टेजवरून मान्यवरांनी मोर्चेकऱ्यांना संबोधित करीत इटलकर कुटुंबाला न्याय देण्याची मागणी लावून धरली. मोर्चा दरम्यान मारुती इटलकर यांच्या मारेकऱ्यांना फाशी झालीच पाहिजे.... बहिणींना न्याय मिळालाच पाहिजे.... न्याय न्याय द्या मारुतीला न्याय द्या.... आरोपींना पाठीशी घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा धिक्कार असो.... सर्व आरोपींना फाशीवर लटकवलेच पाहिजे.... जो वडार समाज की बात करेगा, वो देश पे राज करेगा.... धाराशिव शहर पोलीस ठाण्याच्या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे.... आदींसह विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

 या मोर्चामध्ये पिडित इटलकर कुटुंबिय यांच्यासह वडार एकता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय अध्यक्ष भरत विटकर, प्रदेशाध्यक्ष शिवाजी ननावरे, प्रदेश संपर्कप्रमुख माणिक विटकर, जिल्हा समन्वयक बालाजी शिंगे, मी महाराष्ट्राचा वडार संघटनेचे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव, विकास पवार, राहुल जाधव, अंकुश दुर्लेकर, नितीन चौगुले, धनंजय जाधव, मुक्ताबाई घोडके, गंगुबाई पवार, उषा गुंजाळ, पारूबाई मंजुळे, चंदाबाई देवकर, लक्ष्मी चौगुले, सुनिता चौगुले, सुनंदा चौगुले, लक्ष्मी मंजुळे, मनीषा कुऱ्हाडे, राजेंद्र कुऱ्हाडे, मुकेश चौगुले, संजय देवकर, नागू लंगडे, फुलचंद जाधव, लहू जाधव, अशोक कुऱ्हाडे, दुर्गाप्पा पवार, अंकुश दुर्लेकर, रघु पवार, बाळू गुंजाळ, विकास मंजुळे, दत्ता जाधव, दीपक दुर्लेकर, अंकुश चौगुले, अभिषेक देवकर, महादेव इटलकर, नामदेव घोडके, सुरज जाधव, अनिल चौगुले आदीसह वडार समाजाच्या महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


 
Top