धाराशिव (प्रतिनिधी)- डीपीडीसी'चा रोखलेला विकासनिधी हा काही कणकवलीच्या वडिलोपार्जित मालमत्ता विकून आलेला नाही. त्यामुळे जनतेचे प्रश्न आम्ही मांडणार. ती तुम्हाला किरकिर वाटत असेल तर आम्ही ती वारंवार करणार. प्रत्येक वेळी विमान प्रवासाचा खर्च सरकारच्या मध्यावर मारण्यापेक्षा या आणि धाराशिव येथेच घर करा... अशा शब्दांत ठाकरे शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी मंत्री नितेश राणे यांचा जोरदार समाचार घेतला.
उद्धव ठाकरे शिवसेनेचे खासदार, आमदार किरकिर करीत असतील तर आम्हाला बोलवत चला. आम्ही बघतो येऊन. सर्वांचा बाप म्हणून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदावर बसले आहेत, अशी बोचरी टीका बंदरे व मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांनी शनिवारी शहरातील एका कार्यक्रमात केली होती. त्याला खासदार राजेनिंबाळकर यांनी रविवारी प्रत्युत्तर दिले. या संदर्भात सोमवार दि. 9 जून रोजी भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना प्रतिक्रिया विचारली असता तुम्ही या प्रवृत्तीला का महत्व देता. त्यापेक्षा विकासात्मक कामे करण्यास बुध्दी लागते अशी प्रतिक्रिया दिली आहे.
राणे म्हणाले
शनिवारी ना. राणे शहरात आले होते. पक्षाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांना संबोधत ते म्हणाले, की ठाकरे शिवसेनेचे आमदार, खासदार वारंवार किरकिर करीत असतील तर अधे मध्ये आम्हालाही बोलवत चला. ज्याला जी भाषा कळते त्यामुळे त्याला त्या भाषेत उत्तर द्यावे लागते. मंत्री असलो तरी आपण काही 100 टक्के तसे वागत नाही. प्रॉब्लेम आहे तो आपल्यामध्ये. साहेबाना (खा. नारायण राणे) आठवण करून द्यावी लागते. ”अरे नितेश तू आता मंत्री झाला आहेस.”
खासदार राजेनिंबाळकरांचे उत्तर
धाराशिव जिल्हा नियोजन समितीचा निधी हा काही कणकवलीची वडिलोपार्जित मालमत्ता विकून दिलेला नाही. त्यांनी जर कणकवलीच्या जमीन विकून हा निधी दिला असेल तर जरूर त्यांनी त्यावर अधिकार सांगावा. आता राज्यातील जनतेच्या लक्षात आले असेल की आपण टाकलेल्या मतांची सूज कशी आलेली आहे. ही सूज राज्यातील जनता उतरविल्याशिवाय राहणार नाही. इथे राज्यातील जनता सर्वांचा बाप आहे. जनतेचे प्रश्न जर तुम्हाला किरकिर वाटत असेल तर आम्ही ती वारंवार करणार. त्यासाठी तुम्हाला अधेमधे धाराशिवला यावे लागणार म्हणजे विमान प्रवासाचा खर्च सरकारला भुर्दंड नको. त्यापेक्षा राणे यांना इथेच कुठे तरी जागा, घर शोधून मुक्कामी राहूद्या. म्हणजे किरकिर झाल्यानंतर जे काही करण्याचे 'कॉन्ट्रॅक्ट' त्यांनी घेतले आहे ते त्यांना पार पाडता येईल आणि सरकारचा खर्चही वाचेल.
त्या राजकारणात मला पडायचे नाही
भाजपचे माजी मंत्री तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना पत्रकारांनी मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या टिप्पणीवर शिवसेना उबाठा गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी केलेल्या टीके संदर्भात विचारले असता, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मला या राजकारणात पडायचे नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मित्रा या संस्थेच्या माध्यमातून काम करण्याची मोठी संधी दिली आहे. त्यामुळे कोणी काहीही बोलल्यामुळे मी त्यावर प्रतिक्रिया द्यावी असे काही नाही. त्यावर पत्रकारांनी मित्रा संस्थेच्या उपाध्यक्षांना राज्यमंत्र्यांचा दर्जा नाही असे विरोधक सांगतात. त्यावर बोलताना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी त्या प्रवृत्तीला तुम्ही का महत्व देता असे सांगून विकासात्मक कामे करण्यास बुध्दी लागते. वायफळ बडबड करण्यास मला वेळ नाही असे आमदार पाटील यांनी सांगितले.