तुळजापूर (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यात बीड - सोलापूर महामार्गावर होत असलेल्या चोऱ्या आणि लूटमारीच्या घटनांनी जिल्ह्यात घबराट निर्माण झाली असून याची गंभीर दखल जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली. त्यांनी या प्रकरणी कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. तसेच महामार्गावर चोऱ्या रोखण्यासाठी महामार्गावर सीसीटीव्ही बसविण्याचे आदेशही त्यांनी दिले. 

जिल्ह्यात येडशी पासून पारगाव पर्यंत तेरखेडा, येरमाळा आदी परिसरात चालत्या व थांबलेल्या वाहनातून मालाची चोरी, प्रवाशांना थांबवून लुटमार करण्याचे प्रकार राजरोज घडत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये आणि प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. या घटनांची माहिती शिवसेना सह संपर्कप्रमुख भगवान देवकते यांच्यासह युवासेना संपर्क प्रमुख नितीन लांडगे आणि पांडुरंग घुले यांनी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना दिली. 

या प्रकाराची गंभीर दखल सरनाईक यांनी घेत जिल्हा पोलिस अधीक्षकांना फोन केला. चोरी आणि लूटमारीच्या प्रकाराला तातडीने आळा घाला. जे कोणी चोऱ्यामाऱ्या करत आहेत त्यांना शोधून काढून कारवाई करा. असे प्रकार होणे योग्य नाही, असे सरनाईक म्हणाले. चोऱ्या करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी महामार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवा. हवेतर त्यासाठी जिल्हा नियोजन निधीतून पैसे दिले जातील. त्यासाठी प्रस्ताव सादर करा, असे निर्देशही त्यांनी अधीक्षकांना दिले.


 
Top