धाराशिव (प्रतिनिधी)- बोगस सोयाबीन बियाणांमुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शिवसेनेचे राज्य आंदोलन समन्वयक ॲड. तुकाराम शिंदे यांनी पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्याकडे केली आहे. त्यावर पालकमत्र्यांनी निवेदनाची तातडीने दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

राज्यासह धाराशिव जिल्ह्यात मागील काळात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडला. त्यात बोगस सोयाबीन बियाणांची भर पडल्याने दुसरे संकट ओढवले आहे. जिल्ह्यातील 300 ते 400 एकर क्षेत्रावर सोयाबीन बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे ढोकी, रुई, तुगाव, गोरेवाडी, कळंब या गावांच्या शिवारातील शेतकरी संकटात सापडले आहेत. तसेच बोगस सोयाबीन बियाणांचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. त्यामुळे बोगस कंपन्यांवर कारवाई करण्यात यावी आणि दुबार पेरणीचे संकट आलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ॲड. शिंदे यांनी निवेदनात केली होती.

 
Top