धाराशिव (प्रतिनिधी)-  तुळजापूर तालुक्यातील कुरनूर मध्यम प्रकल्पातील पाणी वितरण व्यवस्था 55 वर्षे जुनी आहे. दुरूस्तीअभावी अनेक ठिकाणी कालव्याला गळती लागली होती. त्यामुळे पूर्ण क्षमतेने पाण्याचे वितरण होत नव्हते. परिणामी 3,500 हेक्टर क्षेत्राला त्याचा फटका सहन करावा लागत होता. वितरण व्यवस्थेत सुधारणा, अस्तरीकरण आणि बांधकाम दुरूस्तीसाठी हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारकडून आपण मिळवून घेतलेल्या 29 कोटी 65 लाख रुपयांच्या निधीतून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. कामाची पाहणी करून जलसंपदाच्या अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.

या कामामुळे 10 गावांतील तीन हजार 643 हेक्टर क्षेत्राला लाभ होणार आहे. कुरनूर मध्यम प्रकल्पाचा मुख्य कालवा आणि वितरिकेमार्फत प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील नळदुर्ग, अणदूर, चिवरी, गुजनूर, खुदावाडी, सराटी, शहापूर, वागदरी आणि बाभळगाव आदी दहा गावांना शेतीसाठी कालव्याद्वारे पाणी दिले जाते. दहा गावांतील तीन हजार 643 हेक्टर क्षेत्र या पाण्यावर अवलंबून आहे. मात्र प्रकल्पाची वितरण व्यवस्था 55 वर्षे जुनी होती. आजवर झालेला वापर, कालव्याची वेळेवर न झालेली दुरूस्ती, अशा अनेक कारणांमुळे पाण्याचा विसर्ग 50 टक्क्यांवर आला होता. कालवा भरावातून, बांधकामातून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याला गळती लागली आहे. त्यामुळे कालव्याच्या शेवटच्या भागात असलेल्या शेतकऱ्यापर्यंत उपलब्ध असलेले पाणी पोहोचण्यास मोठी अडचण निर्माण झाली होती. सिंचन अवर्तनाचा कालावधीही वाढल्याने सिंचन क्षेत्रात मोठी घट झाली असल्याचे निदर्शनास आले होते. अनेक ठिकाणी शेवटच्या टोकाला कालवा बुजविला गेल्याचे स्थानिक शेतकरी बांधवांनी निदर्शनास आणून दिले होते.


 
Top