धाराशिव (प्रतिनिधी)- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या 11 वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षातर्फे ‌‘संकल्प ते सिद्धी' अभियानांतर्गत रविवारी, 15 जून रोजी धाराशिव जिल्ह्यात विविध ठिकाणी ‌‘जनता दरबार'चे आयोजन करण्यात येत आहे. 

माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्त्वात साकार होणाऱ्या या उपक्रमातून नागरिकांच्या अडचणी आणि तक्रारी थेट ऐकून शासकीय यंत्रणा आणि पक्ष पातळीवर त्यांचे निराकरण करण्याचा भाजपचा मानस आहे. जिल्ह्यातील तुळजापूर, धाराशिव आणि कळंब तालुक्यांमध्ये सहा गटांमध्ये हे जनता दरबार आयोजित केले जाणार असून, गावागावातील नागरिकांना आपल्या समस्या मांडण्याची संधी मिळणार आहे. भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी नागरिकांना या दरबारात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. रविवारी सकाळी 10 वाजता जनता दरबाराला सुरुवात होणार आहे. कळंब तालुक्यातील ईटकुर येथे भाजप नेते नेताजी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि अरुण चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली दरबार होईल. शिराढोण येथे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा अस्मिता कांबळे यांच्या उपस्थितीत आणि दत्ता साळुंखे यांच्या संयोजनाखाली कार्यक्रम पार पडेल. धाराशिव तालुक्यातील ढोकी येथे माजी जि.प. सभापती ॲड. दत्तात्रय देऊळकर यांच्या उपस्थितीत आणि अनिल भुतेकर यांच्या अध्यक्षतेखाली दरबार आयोजित होईल. कोंड येथे ॲड. नितीन काळे यांच्या उपस्थितीत आणि नीलकंठ पाटील यांच्या संयोजनाखाली जनता दरबार होणार आहे. तुळजापूर तालुक्यातील काटगाव येथे ॲड. खंडेराव चौरे यांच्या उपस्थितीत आणि महादेव जाधव यांच्या संयोजनाखाली कार्यक्रम होईल, तर नांदगाव येथे दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या उपस्थितीत आणि रंजना राठोड यांच्या अध्यक्षतेखाली दरबार पार पडेल.‌‘संकल्प ते सिद्धी' अभियानातून शासन आणि जनता यांच्यात थेट संवाद साधण्यासाठी भाजपचे नेते आणि कार्यकर्ते गावागावात पोहोचत आहेत.

 
Top