भूम (प्रतिनिधी)- आषाढी वारी निमित्त भूम तालुक्यातून पंढरपूरकडे संत मुक्ताबाई पालखी मार्गावर सरमकुंडी ते वारदवाडी दरम्यान रस्ता खराब झाला होता व खड्ड्याचे साम्राज्य होते. पालखी येण्याच्या अगोदर मार्गावरील रस्ता दुरुस्ती व खड्डे भरून घेण्याची मागणी भूम तालुका वारकरी बांधवांच्या वतीने करण्यात आली होती. त्या मागणीनुसार प्रशासनाकडून मागील चार ते पाच दिवसापासून या मार्गावरील रस्ता दुरुस्ती व खड्डा बुजवणे सुरू झाले आहे.
तालुक्यातून पंढरपूर कडे संत मुक्ताबाई यांची मोठी दिंडी जाते .छोट्या मोठ्या भरपूर प्रमाणात याच मार्गावरून मार्गस्थ होतात .संत मुक्ताबाई पालखी सरमकुंडी फाटा इथून शेंद्री मार्गे जाते .तर संत गजानन महाराज यांची पालखी या रस्त्यावरून परतीच्या प्रवास याच मार्गावरून होतो .मागील महिन्यामध्ये भूम तालुका वारकऱ्यांच्या वतीने पालखी मार्गावरील रस्ता दुरुस्ती व खड्डे बुजवण्याची मागणी केली होती .सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सरमकुंडी ते जवळा फाटा इथपर्यंत खड्डे बुजवण्याचे काम व दुरुस्तीचे काम झाले आहे .व मागील दोन दिवसापासून शिरसाव फाटा ते वारदवाडी रस्ता दुरुस्ती व खड्डे बुजवण्याचे काम चालू आहे .मात्र बार्शी हद्दीतील वरदवाडी ते शेंद्री फाटा हा भाग बार्शी हद्दीत येत असल्यामुळे या मार्गावरील आतापर्यंत खड्डे बुजवलेले नाहीत .बार्शी सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधल्यानंतर पालखी येण्याच्या अगोदर रस्त्यामधील खड्डे बुजवणे व दुरुस्ती करणे होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.