भूम (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील बारमाही टँकरचे गाव म्हणून ओळख असणाऱ्या वालवड गावचा जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेमुळे पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न मिटल्यामुळे वालवड गावाला जिल्हाधिकारी किर्तीकिरण पूजार व मुख्य कार्यकारी अधिकारी मौनक घोष यांनी भेट दिली.
भूम तालुक्यातील वालवड गावाची धाराशिव जिल्ह्यातील बारमाही टँकर चे गाव म्हणून ओळख आहे. जिल्ह्यात कोणत्याही गावात टँकर नाही लागले तरी वालवडला टँकर चालू असतात. गेल्या वर्षी रोज दैनंदिन चार टँकर ने 10 खेपाद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. जवळपास पाच हजार लोकसंख्येचे व सात वस्त्या असणारे वालवड सर्कलचे मोठे गाव आहे. गावासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असल्यामुळे तसेच पाण्याचा कायमस्वरूपी स्रोत नसल्यामुळे कायम टँकर वर गावाला अवलंबून राहावे लागत होते. परंतु यावर्षी जल जीवन मिशन अंतर्गत जांब-मात्रेवाडी साठवण तलावावरून पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्यामुळे वालवड चा कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न मिटला आहे तसेच गाव टँकर मुक्त झाल्यामुळे जिल्हाधिकारी किर्तीकिरण पूजार व मुख्य कार्यकारी अधिकारी मौनक घोष यांनी वालवड ला भेट दिली देवून योजनेची पाहणी करून ग्रामपंचायत व ग्रामस्थांचे आभिनंदन केले.
यावेळी वालवड ग्रामपंचायतच्या वतीने कन्यारत्न योजना अंतर्गत मुलगी जन्मल्यावर तीन हजार रुपये व लेक लाडकी माझ्या गावची योजने अंतर्गत मुलीच्या लग्नासाठी सात हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते. याचे वाटप जिल्हाधिकारी किर्तीकिरण पूजार व मुख्य कार्यकारी अधिकारी मौनक घोष यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मौनक घोष यांनी वालवड आठवडी बाजार विकसित करण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील, तहसिलदार जयंत पाटील, गटविकास अधिकारी जे. टी. वग्गे, विस्तार अधिकारी पी. एम. गलांडे, ए.जी. बोईने, सरपंच प्रभावती देवळकर, उपसरपंच कृष्णा मोहिते, ग्रामपंचायत सदस्य प्रविण खताळ, सिद्धेश्वर सावंत, श्रीहरी बारस्कर, संदीप पाटील, अफजल पठाण, ग्रामपंचायत अधिकारी मुकुंद लवटे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.