तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजाभवानी मंदिराच्या दर्शनासाठी देशभरातून येणाऱ्या हजारो भाविकांचे स्वागत स्वच्छ व सुंदर तुळजापूरमध्ये व्हावे, अशी अपेक्षा असताना प्रत्यक्षात मात्र नगरपरिषदेच्या प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे भाविकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
नगरपरिषद हद्दीत गेल्या दोन महिन्यांपासून रस्त्यावर असलेल्या चेंबरची दुरवस्था झाल्याने रोज किमान आठ ते दहा वाहने त्यामध्ये अडकत आहेत. त्यामुळे वाहनांचे नुकसान तर होतेच, शिवाय भाविकांच्या वेळेची व सुरक्षिततेचीही मोठी हानी होत आहे. स्थानिक नागरिकांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी यापूर्वी अनेक वेळा मुख्याधिकारी व नगरपरिषद अभियंत्यांना यासंदर्भात लेखी व मौखिक निवेदने दिली आहेत. मात्र प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.
बसस्थानक ते पार्किग व छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तुळजाभवानी मंदिर या भागात वाहन अडकल्याच्या अनेक घटना दररोज घडत असून, भविष्यात एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांत संतापाचे वातावरण आहे. “आम्ही अनेकदा तक्रार दिली, पण कोणतीच दखल घेतली जात नाही. रोज गाड्या अडकतात, भाविकांना त्रास होतो. प्रशासनाने तातडीने उपाय करावा,“ अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.